गोवा म्हणलं, की सगळ्याना आठवतो तो निळाशार समुद्र, चंदेरी वाळू, हिरव्या गर्द माडांच्या गर्दीतून डोकावणारे मंदिरांचे रंगीत कळस आणि चर्चेचे पांढरे मनोरे,मासळीचा स्वाद दुणा… आणि बरोबरची झिंग आणणारी पेयं.
सगळेच जण यांचा आस्वाद घेण्यासाठी कधी ना कधी तरी गोव्याला भेट देतातच. खरा गोवा या सगळ्यात आहेच, पण या सगळ्यापलीकडे एक गंभीर पुराणपुरुष गोवा आहे, जो तुम्हा आम्हाला २ दिवसांच्या बस टूरमध्ये अजिबात दिसत नाही. त्याला भेटण्यासाठी गोव्यातल्या सांदीकोपर्यातल्या गावांमधे जायला हवं. जंगलं धुंडाळायला हवीत आणि गांवकार लोकांच्या पुराण्या कथा ऐकायला हव्यात.
तब्बल ४५० वर्ष पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या गोव्यात त्यांनी बांधलेले स्थापत्यशास्त्राचे आणि युद्धनीतीचे पुरावे देणारे अनेक किल्ले पाहण्यासारखे आहेत. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा गोव्यात काही किल्ले व मंदिर बांधली आहेत. सह्य्राद्रीमधल्या दऱ्याखोऱ्यांत पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी असते तितकीच समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर माहिती देणारी अनेक पुस्तके आज उपब्लध आहेत पण गोव्यातील किल्ल्यांबद्दल याबाबतीत फारच उदासीनता आढळून येते. तेरेखोल, आग्वाद, रेइश मागूश, चापोरा असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच गोव्यातील किल्ले सुपरिचित आहेत. त्यामुळे आंतरजालावर या किल्ल्यांची इंग्लिशमधून का होईना पण थोडी फार माहिती नक्कीच मिळते. पण काबो दि रामा, खोर्जुवे, जुवेम, कोळवाळ, राशोल, नाणूस, थीवी, मर्दनगड यासारखे अनेक गोव्यातील किल्ले अनेकांना तर नावाने देखील माहित नाहीत.
गोव्याचे एकूण क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी एवढे असून येथे उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे आहेत. यामधे उत्तर गोव्यात पेडणे, बार्देस, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, फोंडा तर दक्षिण गोव्यात मार्मागोवा, सालसेत (साष्टी), धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण असे एकूण १२ तालुके येतात. अत्यंत निसर्गरम्य अशा ह्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्र राज्य, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य तर पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे. गोमंतक भूमीला इतिहास देखील बहुत जुना. तिसऱ्या शतकात गोमंतक भूमी आधी मौर्य साम्राज्यात आणि त्यानंतर सातवाहन शासनाच्या अधिपत्याखाली होती. १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात गोवा पहिल्यांदा मुस्लीम राजसत्तेखाली आलं पण थोड्याच अवधीत म्हणजे १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात विजयनगर साम्राज्याने गोवा जिंकून घेतलं. पुढे जवळजवळ १५० वर्ष गोवा विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदल. पण १६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० च्या आसपास पोर्तुगीजांनी पूर्वेकडील देशांशी मसाल्यांचा व्यापार करण्याच्या निमित्ताने गोव्यात आपले पहिले पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत म्हणजे सुमारे ४५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. त्यामुळे साहजिकच पोर्तुगीजांनी गोव्यात आपला लष्करी अंमल वाढवण्यासाठी या काळात येथे अनेक किल्ले बांधले. ३०, मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने गोवा हे जगाच्या नकाशावर एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येऊ लागले.
गोव्यातील सर्व किल्ल्यांचा एकत्रित नकाशा
महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील किल्ले तसे फारच लहान आहेत. पण डोंगरकपारीनं वेढलेल्या या राज्यात तब्बल ४२ किल्ल्यांची नोंद झालेली आहे. हे किल्ले या भूमीवरील गतकाळाचे, राजकारणाचे आणि अर्थव्यवस्थेचे उत्तम नमुने आहेत. पोर्तुगीजानी बांधलेले किल्ले गोव्यात सर्वत्र विखुरलेले आहेत. काही गोव्याच्या अंतरंगात नदीच्या मुखावर बांधलेले आहेत तर इतर बहुतेक सर्व समुद्रकिनाऱ्यांवर. काही सेंट आगुस्तीन टॉवरच्या अवशेषासारखे आकाराने प्रचंड मोठे आहेत तर काही छोटे असूनही वास्तूरचनेचा उत्कृष्ट उदाहरण असलेले आहेत. काही किल्ले आदिलशहाच्या वास्तुकलेची संपन्नता सांगतात, तर काही किल्ले पोर्तुगीजांच्या हुकमी चालींची. बेतूल आणि नानुज यासारखे किल्ले तर अगदी शिवाजी महाराजांशी नातं सांगतात. चला मग आता प्रत्येक किल्ल्याची थोडी सविस्तर माहिती घेऊ या. आज पहिल्या किल्ल्याची माहिती घ्यायची आहे ती गोव्याची राजभवनाची “काबो पॅलेसची”.
काबो पॅलेस / राजभवन
एकदा गोव्यात व्यवस्थित बस्तान बसल्यानंतर पोर्तुगीजांनी गोव्याचा कारभार एखाद्या मोक्याच्या शहरातून करायचे मनावर घेतले. सध्या पणजी शहर आहे त्या भागात म्हणजे तिसवाडी तालुक्यात समुद्रात घुसलेले टोक, ज्याला भुशीर म्हणतात, हि अतिशय सुरक्षित जागा हेरली. उत्तरेला मांडवीच्या तीरावर उभारलेला बळकट अग्वादचा किल्ला होता तर दक्षीणेला मार्मगोव्याचा किल्ला संरक्षण देण्यासाठी सज्ज होता. गर्द झाडीने वेढलेल्या या भुशीरावर एका राजवाड्याचे बांधकाम केले गेले. पोर्तुगीज भाषेत भुशीराला “काबो” असे म्हणतात. यावरुन या राजवाड्याला नाव पडले “काबो पॅलेस”.स.न. १५४० मध्ये गोव्याच्या आठव्या गव्हर्नरला म्हणजे दि एस्टेव्हो दि गामा याला हा राजवाडा अधिक सुरक्षित असावा असे वाटले. आणि या परिसराला अधिक संरक्षण मिळावे म्हणून ईथे किल्ल्याची उभारणी करावी अशी कल्पना त्याने मांडली. याच परिसरातील जांभा दगड उकरुन या किल्ल्याची बांधणी झाली. दगड उकरलेल्या खड्यात पाणी साठवण्याची सोय करण्यात आली. पुढे स.न. १५९४ मध्ये या राजवाड्याला अधिकृतरित्या गव्हर्नरचे निवासस्थान म्हणून घोषीत केले गेले. पुढे याच परिसरात एक चॅपेल उभे केले गेले त्याला “नोसा सेन्होरा दि काबो” असे नाव दिले गेले.
या किल्ल्यावर जरी तोफा तैनात केल्या गेल्या असल्या तरी त्यांचा उपयोग कधीही न झाल्याने, या वास्तुत आर्चबिशपचा मुक्काम सन १६५० पर्यंत होता. पुढे सन १७९८ ते १८१३ या कालावधीत ब्रिटीशांनी या जागेचा ताबा मिळवला. फ्रेंचाच्याही या परिसराशी संबंध आलेला दिसतो. अर्थात त्या काळात बांधलेले कोणतेही अवशेष आज दिसत नाहीत. फक्त ईंग्रजकालीन खुण म्हणून एक लष्करी दफनभुमी अजून आहे.
आज मात्र या वास्तुचा पुर्ण कायापालट झाला आहे. आता या वास्तुला राजभवन म्हणून ओळखतात आणि गोव्याच्या राज्यपालांचे हे अधिकृत निवासस्थान आहे. भारतातील कोणत्याही राज्यपालाच्या निवासाला इतका चारशे वर्षाचा इतिहास लाभलेला नाही. ईथल्या दरबार हॉलमध्ये अनेक लोक एकाचवेळी बसु शकतात. तर डायनिंग हॉलमध्ये एकाच वेळी तीस लोक जेवण घेउ शकतात. एका बाजुला मांडवी नदी आणि एका बाजुला समुद्र यामुळे ईथे बसलेल्या व्यक्तीला, आपण जहाजाच्या डेकवर उभारलो असल्याची भावना होते.
एकंदरीत मुळ किल्लेपण हरवले असले तरी हा काबो राजवाडा बदलत्या काळातही आपला आब टिकवून आहे असेच म्हणावे लागेल.
संदर्भः- १) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर २) श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग ३) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ ४) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई ५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी ६) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ
इ.स. १५७० च्या सुमाराला बहामनी सत्तेचे ५ तुकडे झाले. आणि तिसवाडी, बार्देश व साळशेत हे पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले ३ तालुके वगळून बाकीचे तालुके इस्माईल आदिलशहाच्या ताब्यात आले. इ.स. १५८० मध्ये पोर्तुगालवर स्पेनची सत्ता प्रस्थापित झाली. इथून पुढे इ.स. १६४० पर्यंत पोर्तुगालवर स्पेनची सत्ता सुरू राहिली. अर्थातच, या काळात गोव्यावर अप्रत्यक्षपणे स्पेनची सत्ता होती. या काळात पोर्तुगीज सत्ता काहीशी दुर्बल झाली होती. या काळात हॉलंड आणि स्पेन यांचं शत्रुत्व होतं. इ.स. १६०३ मध्ये वलंदेज म्हणजेच डच लोकानी मांडवीच्या मुखात ठाण मांडून गोव्याची नाकेबंदी सुरू केली. इ.स. १६०४ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध, डच आणि कालिकतचा झामोरिन यांच्यात तह झाला. डच आणि पोर्तुगीज यांच्यातल्या चकमकी सुरूच राहिल्या. इ.स. १६४० साली श्रीलंका तर इ.स. १६४१ साली मलाक्का हे दोन प्रांत डचानी पोर्तुगीजांकडून हिसकावून घेतले. समुद्रातून गोव्याची नाकेबंदी इ.स. १६४० च्या दरम्यान परत सुरू झाली. नंतर इ.स. १६६० पर्यंत हे असंच सुरू राहिलं. इ.स. १६६० मधली महत्त्वाची घटना म्हणजे कॅथरिन या राजकन्येच्या विवाहात मुंबई बेट पोर्तुगालकडून दुसर्या चार्ल्सला हुंडा म्हणून मिळालं आणि भारताच्या पश्चिम किनार्यावर इंग्रजांना एक महत्त्वाची जागा मिळाली. आता भारतात पोर्तुगीजांचं राज्य दीव-दमण, वसई, चौल आणि गोव्यातले ३ तालुके एवढ्यापुरतंच उरलं.
छत्रपति शिवाजी महाराज
या दरम्यान, शिवनेरीवर एक तेजस्वी, महापराक्रमी शक्ती १९ फेब्रुवारी १६३० ला उदयाला आली होती. राजे शिवाजी स्वराज्य आणि सुराज्याची स्थापना करून त्याच्या मजबुतीचं काम करत होते. इ.स. १६५६ मध्ये महाराजांनी जावळीवर आक्रमण करुन चंद्रराव मोर्यांचे उच्चाटन केले आणि पुर्ण जावळी व त्यानंतर पुढच्या दोन- तीन वर्षात बराचसा उत्तर आणि दक्षीण कोकण ताब्यात घेतला. हा पराक्रम जेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयला समजला तेव्हा त्याने ५ मे १६५८ रोजी पोर्तुगॉलच्या बादशहाला लिहीलेल्या पत्रात शिवाजी महाराजांची दखल “शहाजीचा पराक्रमी मुलगा” अशी घेतली. या द्रष्ट्या महापुरुषाने तेव्हाच्या कोणत्याही भारतीय शासकाने फारशा न केलेल्या अनेक गोष्टी केल्या. त्यातली एक म्हणजे आरमाराची स्थापना. भूदुर्गांबरोबरच जलदुर्गांची स्थापना. सन १६५७ रोजी मुंबईजवळ कल्याण बंदरात सुवर्णाक्षरांत नोंद घेण्यासाठी एक घटना घडत होती. ते म्हणजे शिवाजी महाराजांचे आरमार. आपला देश, आपला समुद्र असूनही तत्पूर्वी त्यावर आमचा हक्क नव्हता. दूरदेशावरून आलेल्या पोर्तुगिजांकडे समुद्राची मालकी, त्या जोडीला इंग्रज, डच, सिद्धीही त्यावर हक्क आणि मालकी सांगायला. या सर्वांशी संघर्ष करायचा तर नौदल हवेच.
शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर स्थानिक कोळी, भंडारी, मराठे, प्रभु यांना जवळ केले आणि आपला नौदलाचा विचार त्यांच्यापुढे मांडला, पण नौदल – म्हणजे लढायांसाठी लागणार्या नौका मागील कित्येक पिढ्यांनी तयार केल्याच नव्हत्या. नौदलाचे तंत्रज्ञान होते युरोपीय पोर्तुगिजांकडे. पोर्तुगिजांचा कारागीर लुई लैतांव व्हिएगस हा त्याकाळी प्रसिद्ध होता. त्यास शिवाजी राजांनी बोलावून नौदल उभारण्याची जबाबदारी दिली. त्याच्या हाताखाली स्थानिक भंडारी, कोळी लोकांना मदतनिस म्हणून दिले. लुई लैतांव हा, शहाजीराजांचा बंडखोर मुलगा शिवाजीराजे यांच्यासाठी नौदल उभारतोय हे पोर्तुगीज गव्हर्नरला कळले. गव्हर्नरने ताबडतोब लैतांवकडे निरोप पाठवून गुपचूप काम बंद करून निघून येण्यास सांगितले. लुई लैतांव आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस हे क्षणाचाही विलंब न लावता रातोरात स्वत:ला मिळालेले काम आणि त्यासाठी मिळणार्या पैशांवर पाणी सोडून पळून आले. का? तर हे तयार होणारे नौदल आज ना उद्या आपल्याच देशबांधवांविरुद्ध – म्हणजे पोर्तुगिजांविरूद्ध वापरले जाणार आहे म्हणून. पण पोर्तुगीज कारागिरांनी अर्धवट सोडलेले नौदल महाराजांच्या स्थानिक कारागिरांनी असे काय उभे केले की, ते पोर्तुगीज, इंग्रज या बलाढ्य युरोपीयनांनाही पाणी पाजू लागले.
या आरमाराची पोर्तुगीजांनाही एवढी दहशत होती की, त्यांनी राजांच्या नौकांना आपल्या बंदरात येऊ द्यायला नकार दिला होता! अफझलखानाचा वध आणि पाठोपाठ फाझलखान, रुस्तुमजमा यांचा रायबागजवळ पराभव यामुळे गोव्याच्या व्हॉईसरॉय यास आगामी संकंटाची चाहुल लागली. १२ मार्च १६६० च्या पत्रात तो कळवितो, “सरदार शहाजीचा पुत्र शिवाजी सध्या विजापुराजवळ असून विजापुरच्या सरदारांशी त्याचे युध्द सुरु आहे. त्यात त्याने काही सरदारांचा पराभव करुन त्यांचे बरेच घोडे व शिपाई ठार केले आहेत. चौलपासून बांद्यापर्यंतचा सर्व मुलुख शिवाजीच्या ताब्यात आहे.त्याने या मुलुखातील पुष्कळ शहरे आणि समुद्राकाठची बंदरे काबीज केली आहेत, तशीच बरीच संपत्ती मिळवली आहे. विजापुरचा आदिलशहा त्याच्याविरुध्द लढाईची तयारी करीत आहे, पण ती पुर्ण होईल कि नाही याविषयी शंका आहे.कारण एक तर त्याच्या राज्याची अवव्यस्था आणि दुसरे शिवाजीने त्याचे हुशार व वजनदार सेनापती मारले आहे. हल्लीचा विजापुरचा राजा हा दासीपुत्र असल्यामुळे शिवाजी विजापुरच्या तक्तावर दुसरा एक राजपुत्र बसविणार आहे, अशी एक अफवा उठली आहे” ( पत्रसार संग्रह खंड-१ पृ-१८४ ) यानंतर पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांची दहशत घ्यावी अश्या दोन घटना घडल्या. एक १६६३ एप्रिलमध्ये लाल महालात शाहिस्तेखानावर घातलेला धाडसी छापा आणि कुडाळ प्रांतावर केलेली स्वारी. दुसर्या घटनेमुळे शिवाजी राजांचे संकट आता दाराशी आले, अशी पोर्तुगीजांची खात्री पटली. पुढचा संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज व्हॉईसरॉयने तह करण्याचा घाट घातला. त्याला महाराजांनी दरबारी प्रत्युत्तर दिले. १६ एप्रिल १६६३ मध्ये व्हॉईसरॉयने उत्तर पाठविले,” तुमचे पत्र आल्याने पुढील पत्रव्यवहाराला मोकळीक झाली आहे. मी आता डॉन अल्वारो डी आटेड या वजनदार गृहस्थाला तुमच्याशी तहाचे बोलणे करण्याकरिता पाठवून देत आहे. पण तुमचे आमचे बोलणे गुप्त राहिले पाहीजे. तुमच्याविरुध्द कोणतीही गोष्ट त्याने करु नये असे आम्ही त्यास सांगितले आहे” ( पत्रसार संग्रह खंड-१ पृ-२२६ ) वरील पत्रातील आशयास अनुसरुन व्हॉईसरॉयने त्याच्या ठिकठीकाणच्या अधिकार्यांना व किल्लेदाराना हुकुम पाठवून, ‘शिवाजी जोपर्यंत आपल्याशी स्नेहाने वागत आहे तोपर्यंत त्यांनी मोगल छावणीला कसलीही अन्नसामुग्री पुरवू नये’, असे सांगितले. अर्थात शिवछत्रपतीनी जो पुढचा व्युह रचला होता, त्याप्रमाणे पुर्ण कोकणकिनारपट्टी या सर्व आक्रमकांपासून मुक्त करणे याच ध्येयाशी निगडीत होता. वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या सिद्दी, ईंग्रज आणि पोर्तुगीजांचे मुळापासून उच्चाटन करायचे तर त्यांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्यापेक्षा प्रबळ आरमाराची आवश्यकता होती, शिवाय कोणत्याही शत्रुला दाद न देणारे बळीवंत जलदुर्गांची उभारणी करणे आवश्यक होते. एका रात्रीत होण्यासारखे हे कार्य नसले तरी त्याची पायाभरणी केल्यानंतरच या आक्रमकांना कायमचा शह देता येणार होता. संपूर्ण कोकण किनार्यावर महाराजांनी अनेक जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांना धडकी भरवणारा सिंधुदुर्ग इ.स. १६६४ मध्ये अस्तित्त्वात आला. सुरुवातीच्या काळात आदिलशहाच्या विरोधात लढण्यासाठी शिवाजी राजांनी पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पोर्तुगीज घाबरले आणि त्यांनी या लढ्यात गप्प राहणे पसंत केले. या काळात सावंतवाडी संस्थानात लखम सावंतची सत्ता होती. त्याने शिवाजी राजांचे आधिपत्य मान्य केले. कोकणातून राजांचे सैन्य कुडाळ जिंकून पेडण्यात उतरले. इ.स. १६६४ मध्येच डिचोली तालुका आदिलशहाकडून राजांच्या ताब्यात आला. इथे राजांनी आपला तळ उभारला. खवासखानाची स्वारी सन १६६४ ऑक्टोबर मध्ये खवासखान हा आदिलशाही सरदार परत कुडाळ प्रांत जिंकून घेण्यासाठी आला, तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रथम खवासखानाच्या मदतीस येणार्या बाजी घोरपडे याला त्यांच्या गावातच मुधोळ (उत्तर कर्नाटक) येथे गाठून ठार मारले. तेथून त्वरेने येऊन कुडाळ जवळील माणगावच्या खोर्यात मुक्काम ठोकणार्या खवासखानाचा दारुण पराभव करत शिवाजी राजांनी त्याला विजापुरास पिटाळून लावले. खवासखानाच्या पराभवानंतर शिवाजी महाराज कुडाळहून वेंगुर्ले येथे गेले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दहशत बसून पेडणे, डिचोली, साखळी येथील आदिलशाही अधिकारी पळून गेले. तेव्हा पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके प्रत्यक्ष लढाई न करता आणि स्वत: प्रत्यक्ष येथे न येताच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. त्याच वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले. सिंधुदुर्ग म्हणजे १८ टोपीकरांच्या उरावरील शिवलंकाच होती. अठरा टोपीकर म्हणजे अनेक परदेशी व्यापारी सत्ता होत. त्यात गोव्यातील पोर्तुगिजांना सर्वांत जास्त दहशत होती. सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी महाराजांनी हरहुन्नरी जंजिरे (किल्ले बांधणारे गवंडी) कुंभारजुवे येथून नेले होते. शिवरायांचे आरमार सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु सुरू करून शिवाजी महाराज एका अनोख्या मोहिमेच्या तयारीस लागले. ही मोहीम होती नौदल मोहीम.त्यात अनोखे असे काय होते? त्याकाळी समुद्रावर पोर्तुगीज स्वत: सम्राट समजत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही व्यापार करू शकत नसत. त्यामुळे लढाऊ युद्धनौका तर दूरचीच गोष्ट. या पार्श्वभूमीवर पोर्तुगिजांच्या उरावरून म्हणजे गोव्याच्या समुद्रातून आणि सिंधुसागरातून स्वत: युद्धनौका घेऊन कर्नाटकातील पोर्तुगीज आणि आदिलशहाचे बंदर असणार्या बसरूरवर स्वारी करणारा हा पहिला भारतीय राजा होय.
फेब्रुवारी १६६५ च्या सुरुवातीला स्वत: शिवाजी महाराज ८५ गलबते आणि तीन मोठ्या युद्धनौका घेऊन मालवणहून शिडे उभारून पोर्तुगिजांच्या डोळ्यांदेखत आग्वाद, वास्कोच्या किल्ल्यासमोरुन सिंधुसागरातून गेले. बसरुर बंदरात आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्याकडून वसुली घेऊन महाराज परत फिरले आणि गोकर्ण येथे जहाजातून उतरुन गोकर्ण – महाबळेश्वराचे दर्शन घेऊन जमीन मार्गाने कारवारला आले. तेथे इंग्रज व अदिलशहाकडून जबरदस्त वसुलीचे नजराणे स्वीकारून शिवाजी महाराज गोव्यातील सत्तरी तालुक्याच्या सीमेवर भीमगड येथे मुक्कामास आले. गोकर्णहून महाराजांचे गोवा मार्गे येणारे नौदल पोर्तुगिजांनी मुरगाव (वास्को) च्या समुद्रात अडविले. येथे दोन्ही नौदलांची लढाई झाली. त्यात तांदळाने भरलेल्या अकरा बोटी पोर्तुगिजांनी पकडल्या, पण लगेच सोडून दिल्या. याच काळात गव्हर्नरने मुघलांच्या सेवेत असणारा पोर्तुगीज अधिकारी फ्रांसिस्कु-द-मेलु याला लिहिलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो – ‘‘मागील जयाबद्दल शिवाजीस इतका गर्व झाला की, त्याने मुरगावच्या बेटाजवळ आपले आरमार पाठवून या शहरासाठी (म्हणजे गोव्यासाठी) धान्य घेऊन येणार्या जहाजांना प्रतिबंध करण्याचे धाडस केले. पोर्तुगीज आरमाराने त्यांच्या अकरा नौका पकडल्या. याचा अर्थ बसरुर वरून जाताना पोर्तुगीजांच्या ताब्यातील समुद्रात शिवरायांच्या नौदलाने खोडी काढून आव्हान दिले होते. पोर्तुगीजांच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या सिंधुदुर्गाप्रमाणेच दक्षिण सीमेवर रामाचे भूशिर इथला मूळात रामदेवरायाचा जलदुर्ग मजबूत करून घेतला. त्यानी जणूकाही पोर्तुगीजाना त्यांची सीमा आखून दिली की याच्या पुढे तुम्ही यायचं नाही. सभासदाच्या बखरीत या स्वारीचे असे वर्णन केले आहे,”शिवाजी फोंडा घेउन कडवाड (कारवार) शिवेश्वर, मिर्जान, अकोले,कदरे, सुपे,उडवे हे कोट कुलवे घेउन गोकर्ण महाबळेश्वर आणि वर-घाट सुपे येथवर सरद ( सरहद्द) लाविली. गोव्याचे फिंरगीयास दबावून त्यांच्याजवळून तोफा, नख्त जडजवाहीर घेउन आपलेसे करुन त्यास उदीमास कौल देउन आला. असे कुल कोकण काबीज केले ( सभासद बखर पृ- ७१) फोंड्याच्या मुक्ततेचा प्रयत्न इ.स. १६६५ मध्ये राजांना मिर्झाराजेंबरोबर तह करून आग्रा भेटीला जावं लागलं. मार्च, १६६६ मध्ये शिवाजी राजे आग्रा भेटीस निघाले असता इकडे फोंडा आदिलशहांच्या तावडीतून मुक्त करण्याचा प्रयत्न चालू होता. आदिलशहाच्या सैन्याला फोंडा येथे पोर्तुगिजांनी अनेक प्रकारची मदत केली. फोंडा जिंकण्याचा प्रयत्न पोर्तुगिजांमुळे अयशस्वी झाला. पोर्तुगिजांना शिवाजी राजासारखा पराक्रमी आणि ध्येयवादी राजा आपल्या शेजारी नको होता. कल्याण – भिवंडीतील नौदल स्थापना ते फोंडा स्वारी या काळात शिवाजीराजे नक्की काय चीज आहे हे पोर्तुगिजांनी चांगलेच ओळखले होते. त्यामुळे या काळात पोर्तुगीज शिवाजी महाराजांची तुलना युरोपीय महान योद्धे अलेक्झांडर आणि सीझर यांच्याशी करू लागले होते, तर दुसरीकडे पोर्तुगिजांच्या कानावर अशाही आख्यायिका येऊ लागल्या होत्या की, शिवाजी राजांना अनेक जादूई विद्या अवगत आहेत. ते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात. किंवा ते कित्येक फर्लांग लांब उडी मारू शकतात. अशा अचाट आख्यायिका कानी पडण्यास कारणेही तशीच होती. अफझलखान, मिर्झा राजे जयसिंग अशी अनेक जिवावरची संकटे ज्या अद्भुत शौर्याने, धैर्याने त्यांनी परतवून लावली, त्यामुळे गोव्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंतही शिवरायांच्या पराक्रमांच्या आख्यायिका कानी पडू लागल्या. अशा पराक्रमी शिवरायांचा प्रत्यक्ष गोमंतक भूमीवर पोर्तुगीजांबरोबर सामना अजूनही झाला नव्हता. पण लवकरच पोर्तुगीजांच्या कर्माने तो दिवस येणार होता.या आधी पोर्तुगीज थेट शिवरायांच्या वाट्याला गेलेले नाहीत; पण “जो प्रबळ आहे, त्याची बाजु घ्यायची” या न्यायाने जयसिंग- शिवाजी महाराज संघर्षात जयसिंगाची सरशी दिसताच, पोर्तुगीजांनी जयसिंगाला पत्र पाठवून शिवरायांचे आरमार समुद्रात बुडवू, त्यासाठीचा खर्च मुघलांनी द्यावा, असे सांगितले;विशेष म्हणजे हेच शिवाजीराजे आग्य्रावरून सुखरूप स्वराज्यात आल्याचे समजल्यावर निर्लज्ज पोर्तुगीजांनी पत्र पाठवून ( ५ जुलै १६६७ ) शिवरायांचे अभिनंदन केलेले आहे. म्हणजेच, वरून शिवरायांचे अभिनंदन करायचे आणि आतून शिवरायांना विरोध करायचा, हे पोर्तुगीजांचे धोरण शिवराय ओळखून होेते. त्यामुळेच पोर्तुगीजांना धडा शिकवायचा निर्णय शिवरायांनी घेतला. पोर्तुगीजांनी आग्र्याहून झालेल्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांचे जे अभिनंदन केले त्याची एक काहीशी मनोरंजक हकीकत आहे. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर २० नोव्हेंबर १६६७ रोजी महाराज राजगडास येउन पोहचले. त्यानंतर काही दिवसांनी सावंतवाडी, कुडाळजवळच्या मनोहरगडावर येउन दोन महिने राहीले. पोर्तुगीज व्हॉईसरॉयला महाराज ईतके जवळ येउन एवढ्या काळ रहातात, यात धोका वाटून त्याने सुटकेसाठी अभिनंदनाचे पत्र घेउन रामजी शेणवी कोठारी यास मनोहरगडावर जाण्यासाठी फरमावले. पण मनोहरगड उंच, त्यात त्याची शेवटची खडतर चढण त्यामुळे रामजी तिथे जाण्यासाठी टाळाटाळ करु लागला. शेवटी व्हॉइसरॉयने तो नाद सोडला आणि शिवाजी राजे रायगडावर पुन्हा रहायला गेल्यानंतर ५ जुलै १६६७ आपला वकील रामजी शेणवीला पाठविले. इ.स. १६६६ च्या अत्यंत थरारक अशा आग्र्याहून सुटकेनंतर राजांनी अजिबात उसंत न घेता कोकणातून गोव्यावर स्वारी केली. टाकोटाक आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या मर्दनगडाला वेढा घातला. लगेच पोर्तुगीजांनी आदिलशाही सैन्याला मदत सुरू केली. महाराजांनी तरीही हा किल्ला जिंकून घेतला. २२ सप्टेंबर १६६७ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने एक अजब आणि धक्कादायक हुकूमनामा काढला. बारदेशमध्ये जे शिल्लक राहिले आहेत, त्यांनी दोन महिने मुदतीच्या आत धर्मांतर तरी करावे किंवा घरदार सोडून जावे, असा तो हुकूम होता. बारदेशमध्ये त्या काळात उघडपणे हिंदू धार्मिक विधी करण्यास बंदी होती आणि त्यांना सरकारी नोकरीही मिळत नसे. त्यात अशा हुकुमामुळे तर त्यांची परिस्थिती भयंकरच झाली. त्यातच शेजारी शिवाजी महाराजांच्या राज्यांतील देसाई मंडळी महाराजांचे महसूल धोरण त्यांच्या फायद्याचे नसल्यामुळे महाराजांविरूद्ध कारवाया करू लागली, तेव्हा महाराजांनी या देसायांना त्यांच्या पदांवरून हटवून आपल्या कायदा आणि धोरणास अनुकूल अशा देसायांना त्यांच्या जागी नियुक्त करू लागले. असे पदमुुक्त झालेले देसाई पोर्तुगिजांच्या आश्रयास बार्देशमध्ये येऊन राहू लागले. ते पोर्तुगिजांच्या जिवावर स्वराज्यात उपद्रव करू लागले, तेव्हा अशा उपद्रवी देसायांना आणि धर्मांध पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी शिवाजी महाराज गोमंतभूमीत १९ नोव्हेंबर १६६७ रोजी बार्देशमधील कोलवाळ गावात आपल्या सैन्यासह दाखल झाले.
शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन
शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही. स.श. देसाई यांच्या पोर्तुगीज आणि मराठा संबंध या पुस्तकात एका इंग्रज अधिकाऱ्याने दिनांक ३० नोव्हेंबर १६६७ ला लिहून ठेवलेला गोव्यातील एक प्रसंग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांविषयी त्याने लिहिले आहे, “शिवाजीला हिंदूंच्या छळाबाबत वाईट वाटले व त्याने बार्देशवर स्वारी करून हातात लागलेल्या चार पादऱ्यांना हिंदू होण्यास सांगितले, त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. विजरईने शिवाजीची दहशत घेतली आणि धर्मांतराबाबतचे कडक निर्बंध मागे घेतले.” यावरून गोव्यातील हिंदुवर पोर्तुगीज कसे नृशंस अत्याचार करीत होते हे समजते.
२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. शिवाजी राजांनी नोव्हेंबर 1667 साली पाच हजार पायदळ आणि एक हजार घोडेस्वार घेऊन पोर्तुगीजांवर हल्ला केला. हजारो सैनिक कैदी केले आणि दीड कोट पगोडा (पोर्तुगीज चलन) हस्तगत केला. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला. तेव्हा पोर्तुगीजांनी शिवाजी राजांच्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी पाद्री गालेसालू मार्तीस, रामजी शेणवी आणि वकील गोझांलो मार्टिन यांना तह करण्यासाठी शिवरायांकडे पाठवले. 11 डिसेंबर 1667 रोजी पोर्तुगीजांनी शिवरायांशी तह केला. त्या तहान्वये 1) लखम सावंत व केशव नाईक हे विजापुरचे मांडलीक गोव्याच्या हद्दीत पळून आले आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचे प्रजानन या विरुध्द कोणतेही कृत्य करु नये.जर तसे त्यांनी केले तर पोर्तुगीजांनी त्यांना गोव्यातून हाकलावे. शिवाजी महाराजांच्या प्रदेशातील देसायांनीही हाच नियम पाळावा. 2) बालाघाटातून जो माल व वहाने गोव्यात येतील त्याला शिवाजी महाराजांच्या फौजेने अडवू नये. तसेच गोवे, साष्टी व बारदेश येथून जो माल व गाड्या स्वराज्याची जकात देउन बालाघाट व ईतरत्र जातील, त्याला शिवाजी महाराज व आदिलशहा यांचे युध्द सुरु असले तरी अडथळा आणू नये. व्यापार हा उभयपक्षी हितावह आहे. 3) धर्मांतराला प्रोत्साहन देऊ नये, शिवाजी राजांनी बारदेशातून ९ नोव्हेंबर १६६७ रोजी जे पोर्तुगीज अधिकारी, स्त्रीया, मुले यांना कैद केले आहे, त्यांना खंडणी न घेता सोडून द्यावे. ४) नारबा सावंत व मल शेणवी हे पोर्तुगीज मुलुखात आहेत. त्यांनी दंगे टाळण्यासाठी साष्टी व बारदेश येथे न रहाता गोवे शहरात येउन रहावे. जो देसाई पुंडावा करेल त्याला पोर्तुगीज हद्दपार करतील. ५) समुद्र व भुमी यांवर उभयतात स्नेह रहावा. बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. कॉस्मी-द-ग्वॉर्डा याने लिहीलेले शिवचरित्र
शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता. शिवरायांचे डिचोलीतील वास्तव्य या बारदेश प्रकरणानंतर शिवाजीराजे डिचोली येथे पुढे पंधरा दिवस तरी होते, असे अनुमान पोर्तुगीज आणि शिवरायांदरम्यानच्या पत्रव्यवहारावरून तरी दिसते. या पंधरा दिवसांत शिवरायांना येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा चांगलाच अंदाज आला होता. येथे नक्की काय केले पाहिजे, इथल्या लोकांना पोर्तुगिजांपासून नक्की काय त्रास होत आहे, त्यावर परिणामकारक कृती काय केली पाहिजे याचा अंदाज आला होता. त्यासाठी नेमकी कृती करण्याच्या तयारीला शिवाजी महाराज लागले. बार्देशच्या तहाच्या वाटाघाटींनुसार पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आपल्या राज्यातून हाकलून लावले. पोर्तुगीज शिवरायांशी, त्यांच्या वकिलाशीे मैत्रीपूर्वक वागू बोलू लागले होते, पण इकडे शिवाजी महाराजांच्या डोक्यात पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावण्याचा डाव मनात घोळत होता. त्यानुसार परत एक वर्षानंतर शिवाजी महाराज नोव्हेंबर १६६८ मध्ये सैन्य घेऊन डिचोलीस येण्यास राजगडावरून निघाले.
या वेळची मोहीम ही फार आगळीवेगळी होती. आजच्या भाषेत हा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होता. त्या योजनेनुसार वेगवेगळ्या वेशांत मराठा सैनिक आधी ओल्ड गोव्यात वावरू लागले. चारशे ते पाचशे लोक वेश बदलून काम करू लागले. कोणी हमाल, तर कोणी काही वस्तू विकण्याचा बहाणा करू लागले. हळूहळू ही संख्या दुप्पट होणर होती. एकदा पुरेशी तयारी झाली की, अचानक रात्री हल्ला करून ओल्ड गोव्यात शिरणारी एखादी पायवाट ताब्यात घायची. मग बाहेरील सैन्याने मोठा हल्ला करीत पोर्तुगिजांचे सैन्य रणांगणावर उभे राहण्याच्या आत हल्ला करून गोवा पोर्तुगिजांकडून मुक्त करायचे असा बेत ठरला. परंतु दुर्दैवाने कुठे तरी माशी शिंकावी तसा प्रकार झाला. पोर्तुगिजांंना संशय येऊन गुप्त वेशातील सर्व मराठा सैनिक पकडले गेले. यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेंसेती हा आजारी होता. अगदी मरणाच्या दारात होता. आजारी असूनही या गुप्त कटाच्या बातमीने तो ताड्कन उठला. त्याने त्वरेने शिवाजी राजांच्या गोव्यातील वकिलास बोलावून संतापाने बेभान होऊन दोन-तीन थोबाडीत देऊन त्या वकिलाला आणि गोवा शहरात घुसलेल्या लोकांना हाकलून लावले. सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार ही घटना घडली तेव्हा शिवाजी महाराज डिचोलीला येण्याच्या वाटेवर वेंगुर्ला येथे होते. तेथे त्यांना आपला कट उघड होऊन पोर्तुगीज अधिक सावध झाले आहेत हे कळले. या बातमीने शिवाजी महाराज नक्कीच हळहळले असतील, पण निराश झाले नाहीत. त्यांचा अजून एक मोठा बेत होता तो अंमलात आणण्यासाठी ते डिचोली येथे आले. डिचोलीस आल्यानंतर शिवाजी महाराज नार्वे गावातील सप्तकोटीश्वर महादेवाच्या दर्शनास गेले. त्यावेळी सप्तकोटीश्वराचे मंदिर आजच्या सारखे नव्हते. महादेवाची पिंडी ही माडांच्या चुडतांच्या झोपडीवजा मंदिरात होती. या झोपडीतील महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. हा निर्णय महाराजांनी फार विचारपूर्वक घेतला असावा. आणि त्यासाठी सप्तकोटीश्वराची का निवड केली? त्याकाळी डिचोली महालात अनेक देवदेवता या पोर्तुगिजांच्या ताब्यातील बार्देश, तिसवाडी भागातून आणल्या गेल्या होत्या. यातून फक्त सप्तकोटीश्वराचीच निवड का करावी महाराजांनी? बहुधा अगोदरच्या वर्षी बार्देश स्वारीच्या वेळी डिचोलीतील मुक्कामात येथील स्थानिक लोकांकडून पोर्तुगिजांच्या धार्मिक अत्याचारांचा आणि सप्तकोटीश्वराचा इतिहास त्यांना समजला असावा. कदंबांचे राजदैवत सप्तकोटीश्वर हे पोर्तुगीजपूर्व काळातील गोव्यातील समृद्ध आणि वैभवशाली कदंब राजवटीचे आराध्य दैवत. कदंब राजांच्या बिरूदावली मध्ये सुद्धा सप्तकोटीश्वराचा उल्लेख श्रीलब्धवरप्रसाद सप्तकोटीश्वर असा मिळतो. असे सप्तकोटीश्वर महादेवाचे प्राचीन वैभवशाली मंदिर जुन्या गोव्या शेजारील मांडवी नदीच्या पात्रातील दिवाडी बेटावर दिमाखात उभे होते. या वैभवशाली सप्तकोटीश्वरावर पहिला घाला घातला बहामनी राजवटीने. १३५८ साली बहामनी आक्रमणात सप्तकोटीश्वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग शेताच्या बांधावर चिखलात घालून त्याची विटंबना केली गेली. परत पुढे काही वर्षांनी विजयनगर राजांनी गोमंतक भूमी बहामनीच्या तावडीतून जिंकून घेऊन गोव्याचा सुपुत्र माधव मंत्री याने परत विजयनगर राजांच्या उदार राजाश्रयाने पुन्हा त्या मंदिराची स्थापना करून शेतातील चिखलातील सप्तकोटीश्वराच्या शिवलिंगाची दिमाखात स्थापना केली. १३९१ साली विजयनगर साम्राज्याचा पराभव होऊन गोव्यावर बहामनी आणि नंतर विजापूरची आदिलशहाची राजवट सुरू झाली. या राजवटीत अरब मुस्लीम पुरूष आणि केरळीयन स्त्रिया यांची संतती असलेल्या नायटे लोकांचा त्रास स्थानिक जनतेला फार होऊ लागला, तेव्हा या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तेव्हाचे अरबांचे कट्टर शत्रू पोर्तुगीज यांना तिमोजी या गोव्यातील मोठ्या प्रतिष्ठीत माणसाने आमंत्रण दिले. पण हे आमंत्रण पुढे गोव्याच्या इतिहासातील काळ्या अंधाररात्रीचे ठरेल याची कल्पना तिमोजी याला नसावी. सप्तकोटीश्वरावरील घाले १५१० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी सेनापतीने गोव्यावर आक्रमण करून आदिलशाही फौजेचा पराभव करून नायटे लोकांची कत्तल केली. गोव्यातील जनतेला नायटे लोकांचा नायनाट झाला म्हणून समाधान वाटले, पण हे समाधान फार काळ टिकले नाही. सतत मिळालेल्या विजयामुळे उन्मत्त झालेल्या पोर्तुगीजांना त्या काळात पोर्तुगालमध्ये सन १५२१ला गादीवर बसलेला तिसरा दो ज्युआंव या धर्मांध राजामुळे धर्मांधतेचे उधाण आले आणि गोव्यातील देवळे मोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पोर्तुगिजांचा पहिला घणाघात दिवाडी बेटावरील सप्तकोटीश्वरावर पडला सन १५४० मध्ये. सप्तकोटीश्वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग एका विहिरीच्या काठावर बसविले गेले आणि त्या विहिरीतून सक्तीने धर्मांतर केलेल्या लोकांना पाणी काढायला लावले जाई. दिवाडी बेटावरील नार्वे भागात असलेल्या या मंदिराला अशाप्रकारे अवकळा प्राप्त झाली. मंदिराचे रूपांतर चर्चमध्ये झाले. त्यावेळी सप्तकोटीश्वराचे भक्त असणारे डिचोली महालातील सूर्यराव देसाई यांना हे सोसत नव्हते. त्यांनी एका रात्रीत गुपचूप आपल्या लोकांसह दिवाडी बेटावर जाऊन विहिरीवरील शिवलिंग काढून आपल्या डिचोली महालातील हिंदळे या गावी आणले. हिंदळे गावातील कुळागरात या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. कदंब राजाचे आराध्य दैवत दिवाडीतील नार्वे या गावातून हिंदळे गावात असे आले. तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या हिंदळे गावचे नाव बदलून नार्वे असे केले. नार्वे गावात माड-सुपारीच्या कुळागरात माडांच्या चुडतांच्या सावलीत निर्वासीतपणे वसलेल्या या कदंबराजांच्या राजदेवताला राजाश्रय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांना साकडे सप्तकोटीश्वराच्या जीर्णोद्धारात महाराजांबरोबर डिचोलीचे खल शेणवी सूर्यराव व नारायण खल सूर्यराव शेणवी हे देसाई होते. हे डिचोलीचे देसाई अगोदरच्या वर्षी बारदेशच्या स्वारीच्या काळात पोर्तुगिजांच्या आश्रयास होते. त्यांना उपरती होऊन ते स्वराज्यात सामील झाले. यावेळी देसायांना माफी देऊन त्यांचे देसकतीचे वतन त्यांच्या मानसन्मानासह त्यांना परत केले. या कौल पत्रात शिवाजी महाराज स्पष्टपणे म्हणतात की, तुम्ही ‘‘पुरातन वैकुंठवासी राजश्री-महाराज -साहेबांपासून साहेबांचे स्थापित ’’. पुरातन वैकुंठवासी राजश्री महाराज साहेब म्हणजे शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे. शहाजी राजे आणि डिचोलीच्या देसांयांचे संबंध आदिलशाही दरबारात चांगले स्नेहाचे होते, हे डिचोलीच्या देसायांच्या कागदपत्रावरून कळून येते. तसेच सन १६५७ या काळातील शहाजीराजांच्या पत्रात शहाजीराजांनी आपल्या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी पेडणे आणि भतग्राम हे दोन महाल जहागीर म्हणून आदिलशहाकडे मागीतले होते. शके १५९० म्हणजे १३ नोव्हेंबर सन १६६८ या दिवशी शिवाजी राजांच्या आज्ञेने सप्तकोटीश्वराच्या देवालयाचे बांधकाम प्रारंभ केले असा संस्कृत शिलालेख मंदिराच्या दारावर बसविला आहे. खरे तर शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वर मंदिर जिर्णोद्धारासाठी निवडण्याचे कारण काय हे स्पष्टच आहे. नार्वे गावातून नदीपलीकडचा जुने गोव्याचा परिसर स्पष्टपणे दिसतो. त्या काळातील धर्मांध पोर्तुगीजांना स्पष्टपणे संदेश जावा की, तुम्ही येथील राजसत्तेचे प्रतीक असणारे सप्तकोटीश्वर मंदिर जसे हट्टाने पाडलेत, तसे आम्ही ते राजाश्रय देऊन परत हिकमतीने बांधणार. शिवरायांची व्यापारनीती आणि गोवा ‘साता समुद्राचे धनी’ म्हणवून घेणारे पोर्तुगीज शिवाजीराजांच्या बारदेश स्वारी आणि गोव्यावरील गुप्त मोहिमेमुळे पुरते घायाळ झाले. त्यातच पोर्तुगीजांना नमवून केलेल्या तहानंतर शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज परवानगी पत्रे घेण्याचे बंद केले. इतकेच नव्हे तर आपल्या सागरी हद्दीत संचार करणार्या व्यापारी जहाजांना आपली दस्तके घेतली पाहिजेत असा हुकूम जारी केला. या हुकुमानुसार मराठा आरमार अधिकारी पोर्तुगीज व्यापारी नौकांना महाराजांची दस्तके घेण्याची सक्ती करू लागले. हा उलटा प्रकार होत असल्याचे पाहून पोर्तुगीजांच्या इंग्रज आणि डचांच्या बळकावलेल्या व्यापारावर परिणाम होऊन पोर्तुगीज आरमारी आणि आर्थिक सत्ता अधिक केविलवाणी झाली. शिवाजी राजांचे व्यापारी धोरण विदेशी पोर्तुगिजांशी कसे होते हे १६७१ मधील बार्देशच्या मिठावरून कळले. शिवाजीराजांनी समुद्र किनार्यावरील मिठाच्या व्यापाराला कर लावून शिस्त लावली. त्यात पोर्तुगीजांचे बार्देशमधील मीठ व्यापार्यांना स्वस्त पडू लागले. तेव्हा व्यापारी बार्देशातून पोर्तुगिजांचे मीठ खरेदीस जाणार आणि स्वराज्यातील मीठ बंदराला त्यामुळे नुकसान होणार म्हणून शिवाजीराजांनी पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरील आपल्या कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांस आज्ञा केली. संगमेश्वराहून बार्देशचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे, तरी पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती करणे, संगमेश्वराहून बार्देशी मीठास जबर निरख पडे ती गोष्ट करणे. त्यामुळे गोव्यातील पोर्तुगीजांचे मीठ ही शिवाजीराजांनी अळणी करून टाकले. शिवराज्याभिषेकाचा गोमंतकीय साक्षीदार सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाने भारतवर्षाचा भाग्योदय झाला. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाने पुन्हा एक वेगळे वळण घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आज आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजतो, तो इंग्रज वकील हेन्री ऑक्सीडेन यांच्या वहीतील नोंदीमुळे. हा वकील प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समयी इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून हजर होता. त्याने चौकसपणे निरक्षण केलेल्या नोंदीमुळे राज्याभिषेकाचा तपशील समजतो, पण या इंग्रज वकिलाला राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे बारकावे समजावून सांगणारी व्यक्ती गोमंतकीय होती. या व्यक्तीचे नाव होते नारायण शेणवी. नारायण शेणवी दुभाषा म्हणून पोर्तुगीज आणि इंग्रजांकडे काम करीत असे. त्याने इंग्रज वकीलास व्यवस्थित वर्णन करून हा प्रसंग सांगितला म्हणून तो आज आम्हा सर्वांस नीट कळतो. योगायोग असा की, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे सर्वांत प्रसिद्ध असणारे चित्र चितारणारे चित्रकार होते गोमंतकीय सुपुत्र, प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल. एका गोमंतकीयाने प्रत्यक्ष शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहून त्याचे व्यवस्थित वर्णन केले आणि दुसर्या गोमंतकीयाने सर्वांना तो राज्याभिषेक कसा झाला असावा याचे नेत्रदीपक चित्र रेखाटले. फोंड्याच्या किल्ल्यावरची मोहीम राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले. आता त्यांनी लक्ष केंद्रित केलेते फोंडा महालाकडे. त्याकाळी फोंडा हा प्रांत होता. या प्रांताच्या आधिपत्याखाली हेमाडबार्से (सांगे) पंचमहाल, अष्टागार (केपे ) अडवलकोट (काणकोण) हे आजच्या गोव्यातील तालुके येत असत. माडा – पोफळीची कुळागरे, भातशेती आणि बाराही महिने वाहणार्या नद्यांनी हा भाग समृद्ध होता. पण हा भाग अजूनही आदिलशहाच्या ताब्यात होता. सन १६६६ मध्ये शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत झालेल्या मोहिमेत अपयश आले होते, परंतु आता स्वत: शिवाजी महाराज छत्रपती या नात्याने गोव्यात फोंडा जिंकण्यास येत होते. १८ एप्रिल १६७५ रोजी शिवाजी राजांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला. त्याकाळी फोंडा किल्ला फोंड्यातील पंडितवाड्याच्या बाजूस असलेल्या कोट या भागात होता. आदिलशहाच्या येथील किल्लेदाराचे नाव होते रुस्तुमेजमानचा पुत्र महंमद खान. मागील मोहिमेत पोर्तुगीजांनी फोंड्यास आदिलशहाने मदत केली होती. अशी गोष्ट परत होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी तटस्थ राहण्याचे वचन घेऊन विजरईकडे आपला वकील ठेवला. असे असून सुद्धा पोर्तुगीजांनी गुप्तपणे फोंड्याकडे मदतीसाठी धान्याने भरलेली दहा शिबाडे आणि काही माणसे पाठवली. पण मराठ्यांनी ती पकडून नेली. महमदखान हा फोंड्यावरून अटीतटीने झुंजू लागला. युद्धाच्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंची बरीच प्राणहानी होऊ लागली. महाराजांनी चार वेळा फोंड्याला सुरुंग लावले. पण महमदखानने तेवढेच सुरुंग लावून त्यांना प्रत्युत्तर दिले. अखेर महाराजांनी तटापासून बारा फुटांवर सैनिकांसाठी संरक्षक भिंत बांधली व फोंडा घेण्याचा निर्धार करून दि. ८ एप्रिल रोजी २००० घोडदळ व ७००० पायदळानिशी फोंड्याला वेढा दिला. पावसात देखील वेढा सुरु ठेवण्याचे महाराजांनी ठरविले. राजेश्री स्वतः फोंड्यालाच तळ ठोकून बसले होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या करून त्यांना आदिलशाही हद्दीतील एटगेरी व गोवळकोंड्याच्या हद्दीतील दोन शहरांकडे लुट करण्यासाठी रवाना केले. मराठ्यांनी सर्व ठिकाणी प्रचंड लुट करून ती सर्व संपत्ती व काही कैद केलेले सावकार फोंड्याला महाराजांजवळ आणले. पोर्तुगीज गुप्तपणे महमदखानला मदत करत होते. त्यांची कुकली व वरुडे हि गावेही मराठ्यांनी लुटली. महमद खानाजवळ फक्त चार महिने पुरेल एवढीच रसद होती. त्याच्या कुमकेस रुस्तमेजमान १५०० घोडदळ व काही पायदळ घेऊन आला. महमदखान नेटाने तोंड देत होता. महाराजही चिवटपणे वेढा घालून बसले होते. मराठे तटाला भिडण्याचा प्रयत्न करत होते. पण वरून सतत मारा चालू असल्याने मात्रा चालेना. तेव्हा महाराजांनी ५०० शिड्या तयार केल्या. त्यांच्या सहाय्याने ताटवर चढून जाण्याचे धाडस करणाऱ्याला अर्धा शेर वजनाचा तोडा बक्षीस देण्याचे घोषित केले. व असे ५०० तोडे बनविले. मराठ्यांची जिद्द हळूहळू वाढू लागली . पण तेवढ्यातच ८००० घोडदळ व ७००० पायदळासह बहलोलखान चालून येत असल्याची बातमी फोंड्याला येऊन थडकली. त्याला रोखण्यासाठी महाराज तातडीने निघाले. बहलोल मिरजेला होता. त्याने फोंड्याची कुमक करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी झाडे तोडून त्याच्या वाटा बंद केल्या व सर्वत्र पहारे ठेवून त्याची नाकेबंदी केली. (कारवारकर इंग्रजांच्या माहितीनुसार मात्र, महाराजांनी मात्र खानाला ५० होनांची लाच दिली तसेच त्याच्या प्रांताला तसवीस न लावण्याचे वचन दिल्यावरून खानाने महाराजांना विरोध केला नाही.) बहलोलखानाचा बंदोबस्त करून महाराज त्वरेने फोंड्याला परतले. त्यांच्या उत्तेजनावरून मराठे जिद्दीने तटावर चढून गेले. व फोंड्यावरून होणारा मारा बंद पडला असावा असे वाटते. लगेच सुरुंग लावून मराठ्यांनी फोंडा कोट उडवला. शके १५९७, राक्षस नाम संवत्सरे, वैशाख शु. २ ला म्हणजे दि. १७ एप्रिल १६७५ रोजी फोंडा महाराजांनी जिंकला. महमदखान व त्याचे साथीदार कैद झाले. आसपासचे सर्वच आदिलशाही किल्ले मराठ्यांच्या ताब्यात द्यावे असे महाराजांनी त्याच्याकडून लिहून घेतले व मोबदल्यात त्याला जीवदान मिळाले. अन फोंड्याची मुखत्यारी धर्माजी नागनाथला दिली गेली. इकडे पोर्तुगीजांंनी तटस्थ न राहता गुप्त मदत केल्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी फोंड्याचा वेढा चालू असता २९ एप्रिल रोजी पोर्तुगीजांच्या साष्टी (मडगाव) तालुक्यातील कुंकळ्ळी आणि चांदर या गावावर मराठ्यांच्या दोनशे स्वारांनी हल्ला केला. या आक्रमणाची खबर मिळताच विजरईने शिवाजी राजांच्या वकिलास अटकेत ठेवण्याची आज्ञा केली.
५०,००० चे सैन्य जमा करून इ.स. १६७६ मधे महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले. यावेळेला महाराजानी दक्षिणेतील राजांची एकजूट घडवून औरंगजेबाला टक्कर द्यायचं स्वप्न पाहिलं होतं. कुतुबशहाने महाराजांचा मैत्रीचा हात स्वीकारला, पण आदिलशहाने मात्र एवढी समजूत दाखवली नाही. प्रथम महाराजानी तामिळनाडूतील जिंजी आणि वेल्लोर जिंकून घेतले, जे भविष्यकाळात मराठी साम्राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचे ठरले. आदिलशाहीची शरणागती १६ मे रोजी शेवटी फोंडा किल्ल्यातील आदिलशाही फौज शरण येऊन फोंडा प्रांताचे स्वामी शिवाजी राजे झाले. फोंडा जिंकल्यामुळे शिवाजी राजांच्या ताब्यात अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे , केपे, काणकोण, हे तालुके आले. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत आपली स्वराज्य सीमा गंगावल्ली नदी पर्यंत नेली. आता कल्याण – भिवंडी पासून कारवार – अंकोला पर्यंतच्या कोकण प्रांताचे स्वामी शिवाजी महाराज झाले होते. पण त्यात मोठा अडथळा होता पोर्तुगीजांचा. गोव्यातील बार्देश , तिसवाडी, सालसेत आणि मुंबईकडील पनवेलपासून वसई, डहाणू पर्यंत भाग पोर्तुगीजांकडे होता. या भागातून त्यांना कायमचे घालविण्याचा प्रयत्न महाराज सदैव करीतच होते. फोंडा जिंकल्यावर गोवे आता पोर्तुगीजांकडून घेणार ही खात्री इंग्रजांनाही होती. त्यांच्या गोव्यातील वकिलाने मुंबईस लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की शिवाजी आता कारवार प्रांताचा स्वामी झाला असून त्याची पुढची स्वारी गोव्यावर होईल असे बोलतात, पण एकाचवेळी मोगलांशी व पोर्तुगिजांशी युद्ध करण्यात मुसद्दीपणा नव्हता. त्यामुळे शिवाजीने पोर्तुगिजांशी युद्ध टाळले. वेंगुर्ल्याचेे डच आपल्या पत्रात म्हणतात की, शिवाजी राजे, पोर्तुगिजांची कायमची हकालपट्टी करण्यास आम्ही तुमची मदत करू. पोर्तुगिजांच्या साष्ट, बारदेशवर शिवाजी राजे आपला हक्क सांगू लागल्यामुळे पोर्तुगीज शिवाजी राजांना आपला शत्रू मानून भिऊन वागत होते. पोर्तुगिजांना गोव्यातून कायस्वरूपी हाकलून द्यायचे असूनही त्यांना इतर राजकारणापुढे त्यासाठी सवड मिळत नव्हती. पोर्तुगीजांचा समुद्रावर ताबा असल्याने त्यांच्या परवानगीवाचून ईतरांची जहाजे ये जा करु शकत नव्हती, मात्र शिवाजी महाराजांच्या गोवा स्वारीनंतर त्यांच्या लहान गलबतांना पोर्तुगीजांची परवानगीची आवश्यकता नव्हती. तरीही पोर्तुगीज कधी कधी मुळ रंग दाखवायचेच. सन १६७८ मध्ये शिवाजी राजांच्या आरमाराचे दोन मचवे वेंगुर्ल्यापाशी पोर्तुगीजांनी पकडले. महाराजांचा वेंगुर्ल्याचा सुभेदार तानाजी सावंत याने पोर्तुगीजांना दम देताच ते मचवे सोडून दिले गेले. यावरुन पोर्तुगीजांनी शिवछत्रपतींची किती दहशत घेतली होती हे समजून येते. विदेशी शत्रूविरुद्ध मोहीम सन १६७९ च्या सुरवातीला शिवाजी महाराजांनी पश्चिम किनार्यावरील इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज या विदेशी शत्रूसाठी व्यापक मोहीम सुरू केली. तिचा व्याप मुंबईपासून कारवारपर्यंत होता. मुंबईजवळ खांदेरी-उंदेरी हे किल्ले बांधून तिथे मुंबईकर इंग्रजांशी वर्षभर मोठा संघर्ष सुरू केला. जंजिरेकर सिद्धीची नाकेबंदी करून त्याला मर्यादा घातल्या. कारवारला पोर्तुगीजांचे कट्टर शत्रू अरबांना आश्रय देण्याची बोलणी सुरू करून पोर्तुगीजांना घाम आणला आणि गोव्यात पोर्तुगीजांचे नाक दाबण्यासाठी एका महत्त्वाच्या मोक्याच्या जागी किल्ला बांधण्यास सुरवात केली. ती महत्त्वाची जागा म्हणजे आजचा दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या मुखावरचे बेतुल. साळ नदी मडगावजवळ वेर्णा येथे उगम पाऊन मडगाव, चिचोणे, असोळणा मार्गे बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. साळ नदी ही बेतुल येथे शिवाजी महाराजांचे राज्य आणि पोर्तुगीज यांची सीमारेषा होती. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती. बेतुलच्या किल्ल्याची उभारणी बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखेखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. त्यांचा लष्करी अधिकारी – राशोल किल्ल्याच्या किल्लेदाराने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण? बाळ्ळीच्या हवालदाराचे उत्तर ऐकून रासईच्या कॅप्टनने फोंड्याच्या सुभेदारास पत्र पाठविले. पण त्याचे उत्तर लवकर मिळेना. तेव्हा पोर्तुगीज काय समजायचे ते समजले. पण किल्ला पूर्ण झाला तर साष्टीतील जलवाहतूक संकटात येऊन साष्टीच्या सुरक्षिततेची भीती वाटत होती. तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम गुपचूप काही माणसे ठेवून पाडून टाकावे, पण बांधकाम पाडताना पोर्तुगीज सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही हे दाखवावे असे ठरले. पुढील काळात या बेतुलच्या किल्ल्याचे नक्की काय झाले कळत नाही. यावरचा इतिहास उजेडात यायचा आहे, पण आजही पोर्तुगीज पत्रांत वर्णन केलेल्या जागेवर साळ नदीच्या मुखावर बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात बेतुल येथे एक बुरूज आणि त्यावर साळनदीकडे मोहरा करून असणारी तोफ साक्ष देत आहे की, पोर्तुगीजांना घाम आणणारा साळ नदीच्या मुखावर शिवरायांच्या आशीर्वादाने बांधला जाणारा हाच तो बेतुलचा किल्ला. उत्तर कोकणातील पोर्तुगिजांशी संघर्ष :- गोव्याप्रमाणेच उत्तर कोकणात वसईला पोर्तुगीजांचे दुसरे सत्ताकेंद्र होते. स्वराज्याची सीमा या उत्तर फिरंगाणाला भिडली आणि दक्षीण कोकणाप्रमाणेच उत्तर कोकणातही शिवाजी राजे- पोर्तुगीज संघर्ष सुरु झाला. पुरंदर तहामुळे झालेले नुकसान भरुन काढून इ.स. १६७० पर्यंत सुमारे ६०,००० पायदळ आणि ४०,००० घोडदळाची उभारणी करून महाराजानी मिर्झाराजे जयसिंगांबरोबरच्या तहात गमावलेला बहुतेक सगळा मुलुख परत मिळवला. इ.स. १६७२ मध्ये महाराजांनी उत्तर कोकणातील रामनगरच्या राजावर हल्ला चढवला, आणि तो पोर्तुगीजाना देत असलेली चौथाई आपल्याला द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळेला पोर्तुगीजांनी रामनगरच्या राजाला मदत केली. नंतर ६ जून १६७४ ला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि काही काळातच महाराजांनी रामनगरच्या राजाचा पराभव करून पोर्तुगीजांकडे असलेले चौलमधले चौथाईचे हक्क मिळवले. हिंदु मनुष्य मेला म्हणजे त्याची बायको,मुले अनाथ झाली तर एकतर त्यांची मालमत्ता जप्त केली जाई किंवा त्यांना बाटवून ख्रिस्ती केले जाई. वसईतील या जुलुमाची बातमी शिवाजी राजांना १६७५ मध्ये समजली. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी वसईला खरमरीत पत्र लिहीले. या झटक्याने वसईचा कॅप्टन जनरल शुध्दीवर येउन हा छळवाद व जुलुम करणारा कायदा रद्द केला. शिवाजी महाराजांचा मृत्यू सन १६७९ च्या शेवटी शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध विकोपास गेले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली गेली. पोर्तुगीजांनी कुंकळ्ळी येथे पाच हजार सैन्य सज्ज ठेवले होत,े ते फोंडा येथे सुभेदार मदाजी अनंतने पोर्तुगीजांशी लढाई करण्याच्या उद्देशाने जय्यत तयारी सुरू केली. इतक्यात १६८० मध्ये शिवाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी आली, तेव्हा पोर्तुगीजांचा श्वास मोकळा झाला. पोर्तुगीज शिवरायांविषयी लिहिताना तो आमचा महान शत्रू होता किंवा शिवाजी हा युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळात अधिक धोकादायक होता असे म्हणत. शिवाजी महाराजांनी गोव्यातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन केले आणि पोर्तुगिजांच्या आक्रमक राजकारणाला आणि धर्मांधतेला आळा घातला, त्याचबरोबर येथील राज्यकारभारात शिस्त आणली. शिवाजी महाराजांच्या काळी आजच्या गोव्याचा भाग त्यांच्या कुडाळ आणि फोंडा या दोन प्रांतांत मोडत होता. कुडाळ प्रांतात पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके होते, तर फोंडा प्रांतात फोंडा, सांगे ,केपे, काणकोण हे तालुके होते. या प्रांताचे प्रमुख सरकारी अधिकारी सुभेदार असे, तर तालुक्यांचा प्रमुख हवालदार असे. शिवाजी महाराजांचे सुभेदार आणि हवालदार आपल्या राज्यातील व्यापार, प्रजेचे संरक्षण या बाबतीत किती दक्ष होते याची उदाहरणे पाहण्याजोगी आहेत. प्रजाहितदक्षतेचे दाखले डिचोली तालुक्यातील शिरगावात पोर्तुगीज नागरिक आंतोनियु पाइश हा काही शिपाई आणि दोन होड्या घेऊन येऊन देऊ कामत यांच्या घरातील सहा माणसांना पकडून घेऊन गेला, तेव्हा देऊ कामत डिचोलीचा हवालदार नरसो काळो यांच्याकडेे याबाबत तक्रार घेऊन गेला. तेव्हा हवालदाराने लगेच पोर्तुगीज गव्हर्नरकडे तक्रार करून आंतोनियु पाइश याच्यावर कारवाई करून देऊ कामतच्या कुटुंबियांना सोडवावे अशी मागणी केली. तेव्हा गव्हर्नरने या गुन्ह्याची चौकशी करून आंतोनियु पाइशला कैद करून त्याच्या हातापायास बेड्या घातल्या. अधिक चौकशी केली तेव्हा असे कळले की, देऊ कामत हा पाइश याचे सातशे साठ पादवि देणे होता. तेव्हा नरसो काळो ने देऊ कामतच्या पैशाची हमी देऊन देऊ कामतच्या कुटुंबियांची सुटका केली. अशा प्रकारे आपल्या प्रजेसाठी पोर्तुगिजांसारख्या शत्रुकडेही जामीन राहणारे सरकारी अधिकारी शिवरायांचेच असू शकतात. व्यापारी, शेतकरी यांच्या होड्या पोर्तुगीज जप्त करीत, तेव्हाही फोंडा, डिचोली, पेडणे येथील अधिकारी तत्पर दखल घेत असल्याचे दिसते. या संबधी असंख्य पोर्तुगीज कागदपत्रांचे दाखले इतिहास संशोधक स. शं. देसाई यांनी आपल्या शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे या ग्रंथात दिले आहेत.
माझे सर्व लिखाण एकत्रित माझ्या ब्लॉगच्या खालील लिंकवर आपण वाचु शकता. भटकंती सह्याद्रीची
संदर्भ ग्रंथ सूची १) युगप्रवर्तक शिवाजी महाराज- वासुदेव कृष्ण भावे २) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंडळ. सं. शं. देसाई भाग १,२,३ ३) शिवचरीत्र पत्रसार संग्रह भाग १,२,३ प्रकाशन – भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे. संपादन – शिवचरीत्र कार्यालय, पुणे. ४) शिवशाही पोर्तुगेज कागदपत्रे – लेखक – स. शं. देसाई. प्रकाशन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ५) जेधे शकावली व करीना – संपादन – अ. रा. कुलकर्णी, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन ६) सभासदाची बखर- कृष्णाजी अनंत सभासद ८) जिल्हा गॅझेटीयर ९) राजा शिवछत्रपती – लेखक – ब. मो. पुरंदरे, प्रकाशक – पुरंदरे प्रकाशन
पोलदपूरहून खेड – चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटातून गोवा, रत्नागिरीकडे जाणार्या गाड्या रात्रंदिवस धावत असतात.पण या वर्दळीवर एक प्राचीन गड नजर रोखून बसला आहे, हे कोणाच्या गावीही नसते. रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात पुर्वबाजुला असलेल्या डोंगराच्या कुशीत कोंढवी हे प्राचिन गाव वसले आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या उत्तरेला घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन कोंढवी- देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी.
कोंढवी पोलादपुर परिसराचा नकाशा
मुंबई – पुण्याहून कोंढवी गडावर जाण्यासाठी प्रथम मुंबई – गोवा मार्गावरील पोलादपूर हे गाव गाठवे. पोलादपूरहून कोंढवी / आदेशपूर फाटा ७ किमी अंतरावर आहे. किंवा धामणदेवी येथे जाउन कोंढवी गाठता येईल. फाट्यापासून कोंढवी गाव ३ किमी अंतरावर आहे. पोलादपूरहून खाजगी वाहानाने किंवा सहा आसनी रिक्षाने कोंढवी गावात जाता येते. कोंढवी गाव गडाच्या पाऊण उंचीवर असल्यामुळे येथून गडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. पोलादपुरवरुन कोंढवीसाठी एकच बस सकाळी आठ वाजता आहे.
पोलादपूर जवळील कोंढवी गाव उर्फ तळ्याची वाडी येथे कोंढवी किल्ला आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गडावर पिण्यालायक पाणी नाही म्हणून पाणी गावात भरुन घेणे योग्य.गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो.गावापासून ते गडापर्यंत थेट डांबरी रस्ता झाल्यामुळे स्वताची गाडी असेल तर सरळ किल्ल्याच्या माथ्यावर जाउ शकतो. या गडाचे गडपण दाखवणारे तसे अवशेष म्हणजे तटबंदी, दरवाजा, तोफा काहीही ह्या गडावर नाही.गडपण दर्शविणार्या वस्तू ज्या ठिकाणी होत्या, त्या ठिकाणावर आता नाहीयेत. बर्यापैकी वस्तू गावकऱ्यांनी भैरव मंदिराजवळ आणून ठेवलेल्या आहेत. भैरवनाथ मंदिर मंदिराच्या आवारात जुन्या मंदिराचे कोरीव व घडीव दगड पडलेले आहेत. भैरव मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार केलेला असुन मंदिराच्या गाभाऱ्यात भैरोबा व भैरी देवीच्या पाषाणात कोरलेल्या मुर्ती व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पहायला मिळते. या डोंगराच्या पंचक्रोशीत कोंढवी, फणसकोंड, गांजवणे, खडपी, धामणदेवी, चोळई, खडकवणा व गोलदरा अशी आठ गावे असून या गावांचे हे श्रध्दास्थान असल्याने हे मंदिर आठगाव भैरवनाथ म्हणुन ओळखले जाते. गावातुन चालत येण्यासाठी मंदीरासमोरच पाऊलवाट आहे. मंदिराच्या मागील भागात साचपाण्याचे एक लहान टाके आहे पण त्यात डिसेंबरपर्यंत पाणी असते. टाक्याच्या पुढील भागात उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात. मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. या पैकी आठ मूर्ती अतिशय सुस्थितीत असून एक मूर्ती भग्न झालेली दिसते. कदाचित त्यामुळेच त्याला कुलूप लावून बंद केलेले आहे. हे मंदिर ही पुरातन आहे. हे मंदिर मुस्लिम स्थापत्य शैलीचे आहे. या खोलीच्या मागील बाजूस ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे पण ते नेमके कशाचे आहे ते कळत नाही. अश्या प्रकारचे शिल्प बहुतेकदा निजामशहाच्या ताब्यातील किल्ल्यावर पहाण्यास मिळते.असे शिल्प दापोलीजवळील मंडणगडावर देखील आहे.
या शिल्पापुढे काही अंतरावर दोन भग्न वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. हे मंदिर राहण्यासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु सध्या ते कुलूप लावून बंद केलेले असते.गड परिसरात प्रचंड वाढलेल्या गवतामुळे अजून काही अवशेष असतील तर सापडणे कठीण आहे. कोरडा तलाव आणि चाफा मात्र त्या कोरड्या तलावाच्या शेजारी चाफ्याचं झाड दिसलं. ही तशी महत्त्वाची खूण आहे. या तलावाच्या दुसर्या बाजूला एक वडाचे झाड आहे. तुळशी वृंदावन, पिंड मंदिराच्या समोरच आपल्याला काही जुने दगड, मूर्ती दिसतात. त्यात एक नव्याने बांधलेलं तुळशीवृंदावनही आहे. त्याच्या शेजारी असलेली शंकराची पिंड सुंदर आहे. अतिशय छान नक्षीदार असलेली ही पिंड एका चौरंगासारखी आहे. मध्यभागी एक कमळ ही कोरलेलं आहे. हनुमान मंदिर शिल्प पाहुन डांबरी रस्त्यावर येऊन काही अंतर चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर हनुमानाची मुर्ती पहायला मिळते.त्या मंदिरात जाणाऱ्या वाटेवर जुन्या अवशेषांचे काही भाग दिसत होते. ते वाड्याचे अवशेष वाटत होते. या मार्गावर जुन्या पायऱ्यांचे काही अवशेषही आहेत. इथे एक मूर्ती हनुमंताची आहे तर त्याच्या शेजारची छोटी मूर्तीही हनुमंता सारखीच वाटते. या चौथऱ्याच्या उजव्या बाजुस गाळाने भरलेला तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी दगडात बांधलेल्या १६ पायऱ्या पहायला मिळतात. या मारुती मंदिरापासून पुढे आपण टेकडीच्या माथ्यावर जाउ शकतो. मात्र टेकडीवर कोणतेही अवशेष नाहीत.किल्ल्याची उंची समुदसपाटीपासून ७९० फुट आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाचा परीसर ५ एकरमध्ये सामावला आहे. गडावरील इतर अवशेष नष्ट झाल्याने इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. मंदिरासमोरून आग्नेयेला रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात.तर पुर्वेला प्रतापगड स्पष्ट दिसतो. गड पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
कोंढवी गडाला भेट देण्याबरोबरच पोलादपुर गावात असलेल्या कविंद्र परमानंद यांच्या समाधीला ही भेट देता येईल.तसेच तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावालाही भेट देता येईल. आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर गावात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी, महाड, बिरवाडी, तुडील, विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी मधील उमरठ, ढवळे, खोपडी, दांदके हि चार गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती.
( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
‘अन्नासाठी दाही दिशा| आम्हा फिरविसी जगदीशा’ हा भोग काही सन्माननीय अपवाद वगळता सगळ्यांच्याच नशिबी लिहिला असल्यामुळे सतत पैशाचा विचार करून धावपळ करण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात सहा दिवस राबल्यावर मिळणारी एक दिवसाची सुट्टी हे आकर्षण असल्यामुळे कष्ट थोडे सुसह्य होतात. बहुतेक जण आठवड्याचा शेवट जवळ आला की सुट्टीच्या दिवशी काय करायचे हे प्लॅनिंग सुरू करतात. एकतर भरपूर झोप काढायची, राहिलेली कामे करायची, कुटुंबासहित गावात भटकायचे किवा हॉटेलिंग करायचे, यात दिवस संपतो आणि पुढचा आठवडा आणि पोटासाठीची पळापळ पुन्हा सुरू होते.
मात्र आम्हा भटक्यांचे याबाबत वेगळेच धोरण असते. फक्त बुधवार, गुरुवार हे दोनच दिवस कामात लक्ष लागते. शुक्रवार-शनिवार भटकंतीच्या प्लॅनिंगमध्ये जातात, तर सोमवार-मंगळवार नुकत्याच केलेल्या ट्रेकच्या आठवणीत आरामात सरतात. बेभान निसर्ग, दाट वनराई, मुक्तपणे वाहणारे ओढे, नद्या, बेलाग कड्यावरून झोकून देणारे धबधबे, रौद्र सुळके, अलगद शिखरमाथ्यावर घेऊन जाणार्या डोंगरवाटा, पाताळवेरी गेलेल्या दर्या, डोंगरकुशीत वसलेली राउळे हा सर्व समृद्ध खजिना मनसोक्त लुटू देणारा अग्निपुत्र सह्याद्री. सर्व चिंता विसरायला लावणारी आणि जगण्याचे बळ देणारी ही सह्यगिरीतील भटकंती हे घुमक्कडांचे पहिले प्रेम. डोंगर फक्त दुरूनच नाही, तर जवळूनही तितकेच साजरे असतात, याचा प्रत्यय देणारी ही भ्रमंती पुन्हा पुन्हा साद घालते आणि या प्रेमाच्या सादेला नकार देणे केवळ अशक्य असते.
अर्थात एकदा घराच्या उबेतून आणि सुरक्षित कवचातून बाहेर पडून डोंगरात भटकायला सुरुवात झाली की विविध प्रकारचे अनुभव येणार, हे ओघानेच आले. निरनिराळ्या प्रकारचे मानवी नमुने भेटतात, गाडीतून जायचे तर त्याचे वेगळे किस्से होतात, खादाडीतून अनेक ठिकाणच्या चवी जिभेवर आणि मेंदूत नोंदल्या जातात, शिवाय बरोबर असलेले भिडू अचाट असले की काही विनोदी प्रसंगही निर्माण होतात. पण याबरोबरच आणखी एक संपूर्ण वेगळे जग सामोरे येते, ते म्हणजे वन्य प्राण्यांचे. मानवाने निसर्गावर जे प्रचंड आक्रमण केले, त्यामुळे वन्य प्राणी आता शहरातही येऊ लागलेत, पण हेच प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्यातच खरा आनंद आहे. भटकंतीत असे अनुभव नक्की येतात. याच वन्य अनुभवांविषयी लिहायचे मनावर घेतले आहे. अर्थात यात पक्ष्यांच्या दर्शनाविषयी लिहिणार नाही.
कोणत्याही गडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचले की आपले स्वागत होते त्या गावच्या अनभिषिक्त राखणदारांकडून – अर्थात श्वान मंडळींकडून. मी दिसलो की यांना गतजन्मीचा वैरी भेटल्याचा आनंद होतो की काय, कोणास ठाऊक! लगेच ही मंडळी माझे जंगी स्वागत करायला आवेशाने पुढे येतात. अर्थात आज यांच्यावर काही लिहिणार नाही. मात्र एकदा गाव सोडून गडाच्या चढणीला लागले की वृक्षवल्ली आणि वनचरे भेटायला सुरुवात होते. अर्थात वनचरे म्हणजे अगदी जमिनीवरून वेगात पळापळ करणारे किडे, त्यांचे पंखधारी भाऊबंद, झाडांवरून स्वच्छंद विहार करणारे विहंग, मानवी चाहूल लागली की आपले नसलेले पाय ओढत पळून जाणारे सर्पराज आणि चार पायांचे वन्यजीव हे सगळेच भेटतात.
सर्वप्रथम कीटकांच्या विश्वात जाऊ या. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मुंग्या दिसतात, त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या अनोख्या आकाराच्या वारुळामुळे. सह्याद्री आणि परिसरात आपल्याला एखाद्या गुलाब फुलाच्या आकाराचे वारूळ पाहायला मिळते. मागे २००१ साली माहुलीवर गेलो होतो, तेव्हा मुंग्यांनी त्यांच्या जा-ये करण्याच्या मार्गात कसली तरी पांढरी पूड पसरली होती, त्यामुळे त्यांचे हायवे स्पष्ट दिसत होते. गडाच्या परिसरात घेर्यात असलेल्या गावातील गावकरी गुरे चारायला आणत असल्यामुळे त्यांचे शेण सर्वत्र पसरते. साहजिकच या शेणाचे गोळे करून एक जण मागच्या पायाने, तर एक जण पुढच्या पायाने हे शेणगोळे ढकलत त्यांच्या बिळाकडे नेतात. मोठे मजेदार दृश्य असते. माहूरच्या रामगडाच्या उतारावर असे मोठ्या संख्येने शेणीकिडे बघायला मिळाले. रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या सुरगडावरून उतरताना एका पानाआड काहीतरी लपलेले दिसले. उत्सुकता म्हणून पान बाजूला केले, तर विंचवाचे एक पिल्लू सरपटत गेले. त्याक्षणी ट्रेकिंगमध्ये बुटाचे महत्त्व समजले.
या कीटकमंडळींनी दोनदा मला चांगलीच आठवण राहील असे अनुभव दिले. रायरेश्वरला भेट देऊन रायरेश्वर-केंजळगड जोडणार्या धारेवरून एकटाच चालत निघालो होतो. मध्ये दाट झाडांचा एक पट्टा होता. सप्टेंबर महिना असल्याने झाडी दाट होती. अद्याप त्या वाटेवर मानवी वावर नसावा. साहजिकच झाडांना अंग घासत त्या परिसरातून पुढे गेलो. केंजळगड पाहून घरी आलो. मात्र काखेत काहीतरी चावत असल्यासारखे वाटत होते, म्हणून निरीक्षण केले तर एक गोचीड कातडीला घट्ट पकडून बसली होती, त्याच्या त्या वेदना होत्या. डॉक्टरांचा ऑपरेशनचा चिमटा माझ्याकडे होता. तो मेणबत्तीवर तापवून त्या गोचिडीला पकडले. भाजल्यामुळे त्या गोचिडीची पकड ढिली झाली आणि ओढून गोचीड जमिनीवर सोडली. थोडे निरीक्षण झाल्यावर मेणबत्तीचे मेण त्या गोचिडीच्या अंगावर ओतून तिची ममी तयार केली.:-)
पुन्हा गेल्या वर्षी माहुलीला गेलो असताना भांडारगडावर विश्रांती घेण्यासाठी आडवा झालो असताना एक गोचीड नकळत पोटावर चढून चिकटून बसली. बहुधा आधीच्या गोचिडीची मी ममी केल्याची या गोचिडीला माहिती असावी, कारण मला काहीही जाणीव होत नव्हती. आपल्यावर ममीफिकेशनची वेळ येऊ नये, म्हणून अगदी निमूटपणे ही गोचीड पोटावर ठाण मांडून बसली होती. अर्थात माझे वेळीच लक्ष गेले आणि या गोचिडीलाही मी स्वर्गाची वाट दाखवली.
पावसाळ्यात पुर्ण बहरात असलेला निसर्ग पाहिला की घरी बसणे केवळ अशक्य! पण पावसाळ्यात सह्याद्रीत भटकायचे, म्हणजे एका जिवापासून जपायला हवे, ते म्हणजे ‘जळवा’. हिंदी चित्रपटातील हिरॉइनचा जलवा कितीही आकर्षक असला, तरी सह्याद्रीतील मराठी जळवा मात्र लई डेंजर असतात, बरे का! विशेषतः पन्हाळगड ते विशाळगड या महाराजांच्या पाऊलखुणा शोधत जायच्या स्मरणयात्रेत यांचा प्रसाद हमखास मिळतो. मी याच ट्रेकमध्ये जळू हा प्रकार पहिल्यांदा बघितला. मुख्य म्हणजे जळू शरीराला चिकटते, तेव्हा आपल्याला जाणीव होत नाही; पण जेव्हा तिचे पोट भरते आणि ती आपल्या शरीरावरून खाली उतरते, तेव्हा तिने रक्त पातळ राहावे म्हणून आपल्या शरीरावर जो द्रव सोडलेला असतो, त्याने जळजळ सुरू होते. अर्थात तोपर्यंत जळूचे पोट भरलेले असते. एकतर आगकाडी पेटवून जळूला त्याचा चटका द्यायचा किंवा जळूच्या अंगावर हळद टाकायची. (माणसाच्या अंगावर हळद पडली की तो सरळ होतो, तिथे बिचार्या जळूची काय कथा?) किंवा जळवा असणार्या प्रदेशातून जाताना पायांना साबण चोळावा, म्हणजे जळवा शरीरावर राहत नाहीत.
उन्हाळी ट्रेकमध्ये हमखास दिसणारे दृश्य म्हणजे काजवांच्या चमचमत्या रोशणाईचे. कोकणात ट्रेक असेल तर दाजीपूर्, आंबोली, करुळ कोणत्याही घाटाने खाली कोकणात उतरताना या काजव्यांनी झाडे अक्षरशः लगडलेली दिसतात. असाच एकदा कोकणातील गड पाहून मित्राबरोबर कोयनामार्गे कराडला परत येत असताना अक्षरशः प्रत्येक झाड काजव्यांनी भरलेले होते. विशेष म्हणजे एकदा त्रिपुरी पौर्णिमा साजरी करायला राजगडावर गेलो होतो. संजीवनी माचीवर सूर्यास्त पाहून परत येत असताना बालेकिल्ल्याच्या परिसरात झाडीवर काजवे दिसले होते. असेच मित्रांसह महाबळेश्वरजवळच्या मधुमकरंदगडाकडे निघालो होतो. रात्रीचा प्रवास होता. ट्रेकिंग ग्रूप एका मिनीबसमध्ये भरून चतुरबेटकडे निघालो होतो. पण रस्त्याचा काहीतरी घोळ होऊन वाट चुकली. बस रिव्हर्स घ्यायला जागा नसल्याने सगळे जण खाली उतरलो आणि ड्रायव्हर बस उलट घेऊ लागला. पण तितक्यात रस्त्याच्या बाजूला एका झाडावर असंख्य काजवे लखलखताना दिसत होते. त्रासदायक प्रवास, वाट चुकल्याचा वैताग हे सगळे विसरून आम्ही ती काजव्यांची दिवाळी थक्क होऊन पाहत होतो. याच काजव्यांची, विसरता न येणारी आणखी एक आठवण आहे ती तुंग उर्फ कठीणगडाची. इथे जायला लोणावळ्यावरून संध्याकाळी पाचला एकच बस सुटते, जी दुसर्या दिवशी सकाळी परत लोणावळ्याला जाते. त्यामुळे ऐन मे महिन्यात संध्याकाळी हा गड बघून दुसर्या दिवशी सकाळी परत जायचे प्लॅनिंग केले. गड बघून पायथ्याच्या तुंगवाडीत एका आजोबांच्या शेणाने सारवलेल्या अंगणात चादर पसरून झोपेची आराधना करत होतो. डोक्यावर एक झाड होते. पानगळीमुळे झाडाचा खराटा झाला होता. त्यावर असंख्य काजवे टिमटिमत होते. बहुधा अमावस्या जवळ असल्यामुळे निरभ्र आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्या झाडाच्या निष्पर्ण फांद्यांतून दिसणारे तारे आणि फांद्यांवर चमकणारे काजवे हे आयुष्यभर न विसणारे दृश्य अनुभवले.
सह्याद्री परिसरात आणखी दिसणारे अष्टपाद कीटक म्हणजे कोळी. यात जाळे विणून स्वत:ची सही करणारे सिग्नेचर स्पायडर आपले जाळे विणून शांतपणे भक्ष्याची वाट बघत बसलेले दिसतात. पण त्याहून मजेदार असतात ‘डॅडी लाँग लेग’.
बर्याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच वाचलेले असले, तरी कदाचित हे कोळी बघितले नक्कीच असतील. साधारण गुहांमध्ये, वावर नसलेल्या गडावरच्या इमारतीत काळोख्या, दमट जागेत हे कोळी दिसतात. बुरशी, शेवाळ, वनस्पती, छोटे कीटक, मेलेल्या कीटकांचे / प्राण्यांचे / वनस्पतींचे अवशेष, पक्ष्यांची विष्ठा अशी फुल्ल व्हरायटीचे खाणे हे अनोखे नाव असलेले कोळी खातात. यांचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे – आपल्या शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी हे सर्व जण समूह करून राहतात. भक्षकाची चाहूल लागताच हे पायावर ताठ उभे राहून शरीराचा भाग एखाद्या स्प्रिंगप्रमाणे खाली-वर हलवायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांचा भक्षक गोंधळून जातो.
शेवटचा काहीशी दहशत असलेला कीटक म्हणजे मधमाश्या. बर्याच भ्रमंतीत मला या माश्यांची पोळी दिसली. सुरगडावर तर रिकामे झालेले पोळे सापडले. पण या मधमाश्यांचा एक अनोखा अनुभव मी घेतला तो सावंतवाडीजवळच्या मनोहरगडावर. रांगणा किल्ल्याच्या परिसरात एकाच डोंगरावर मनोहर-मनसंतोष हे जुळे किल्ले आहेत. वाट तुटल्यामुळे मनसंतोषगडावर जाता येत नसले, तरी मनोहरगडावर मात्र जाता येते. या मनोहरगडावर जायची वाट शेवटच्या टप्प्यात प्राण कंठाशी आणणारी आहे. मी कसेबसा चढून तर गेलो, पण त्या घसार्यावर उतरताना दिव्य करावे लागले. ऐन मे महिन्यात या गडावर मी गेलो होतो आणि दुपारची वेऴ होती. मनोहरगडावर एक बांधीव विहीर होती. गड बघत तिथल्या वास्तूंच्या नोंदी ठेवत, नकाशा तयार करत मी त्या विहिरीपाशी पोहोचलो, तर थक्क करणारे एक दृश्य मला पाहायला मिळाले. विहिरीच्या पाण्यात मधमाश्या झेप घेत होत्या आणि बाहेर येत होत्या. उन्हाच्या कडाक्याने तहानलेल्या मधमाश्या पाणी पीत होत्या! आवाज आणि हालचाल न करता शांतपणे हे दृश्य मी खूप वेळ पाहत होतो. हल्ली याच मनोहरगडाच्या परिसरात काळ्या बिबट्याचा वावर आहे.
किड्यांनी केलेले किडे वाचल्यानंतर, पृथ्वीवर प्राचीन काळापासून अस्तित्व राखून असलेल्या जिवांकडे जाऊ या.. खरे तर जायला नको, कारण सर्व जण यांची संगत टाळतात, ते म्हणजे अर्थातच साप. सन १८१८ला सह्याद्रीत इंग्रजांचा वरवंटा फिरला आणि नांदते, जागते गड ओस पडले. एकदा मानवी वावर बंद झाल्यावर साहजिकच इथे वावर सुरू झाला तो वन्य श्वापदांचा, साप-विंचवांचा. साहजिकच अशा वर्दळ कमी असलेल्या गडावर गेल्यास अपरिहार्यपणे सर्पकुळाची भेट होते. अर्थात, साप मानवाला घाबरत असल्यामुळे बहुतेकदा त्यांची पहिली प्रतिक्रिया पळून जायची असल्याने आपण शांतपणे उभे राहिल्यास साप त्यांच्या वाटेने सळसळत निघून जातात, असा स्वानुभव आहे.
तोरण्यावर मी व माझा मित्र दोघेच गेलो होतो. पूर्ण गड फिरून झाल्यावर परत जाताना दोघे वेगळ्या वाटेने गडाच्या दरवाजाकडे निघालो होतो. अचानक एक साप वेगाने माझ्यापासून जेमतेम तीन-चार फुटांवरून आडवा गेला. त्या क्षणी गडाच्या बांधणीच्या विचारात चालणार्या मला खाडकन वस्तुस्थितीची जाणीव झाली की ‘आपल्या आजूबाजूला साप आहेत.’ त्या क्षणी भीतीची लहर अंगात गेली, तरी नंतर मात्र या सापांवर बरेच वाचन केल्यावर बिनविषारी आणि विषारी साप ओळखता येऊ लागले आणि भीतीपेक्षा कुतूहल वाटू लागले.
पनवेलजवळच्या माणिकगडावर वडगावमार्गे एकटाच निघालो होतो. गडावर जायचा नेमका रस्ता सापडेना. एका शेतकर्याला विनंती केल्यावर तो रस्ता दाखवायला बरोबर आला. त्याच्याबरोबर शेतातून चालत होतो. अचानक एक काळसर पट्टेदार साप आडवा गेला. मण्यार होता तो. त्या शेतकर्याने चटकन ओळख सांगितली. अर्थात एव्हाना मी बराच सरावलो असल्यामुळे फार भीती वाटली नाही. याच माणिकगडावर चढताना पुन्हा दोन-तीन साप आडवे गेले, पण त्यांची तारांबळ बघायला मजा आली.
अलिबागजवळचा सागरगड एकटाच चढत होतो. धबधबा बघून सिद्धेश्वरच्या देवळाकडे निघालो होतो. एवढ्यात हिरव्या रंगाचा एक छोटा साप झाडावरून टपकन समोर पडला आणि काही कळायच्या आतच सळसळत दिसेनासा झाला. असा साप डोक्यावर पडू शकतो अशी जाणीव इथे झाल्यानंतर मात्र ट्रेक संपेपर्यंत टोपी डोक्यावर ठेवायची सवय लागली.
लोणावळ्याच्या आणि भुशी डॅमच्या गोंगाटी गर्दीतून एकदाचे बाहेर पडून आम्ही तिघे – म्हणजे मी आणि माझे दोन मित्र तुंगची वाट तुडवत होतो. या तुंग परिसरात महिंद्राचे हॉलिडे होम झाले असले, तरी तुंग गावात दिवसातून एकच एस.टी. बस जात असल्यामुळे घुसळखांब ते तुंगवाडी पायपीट करण्याला पर्याय नव्हता. शेजारून ऑडी, मर्सिडीज, बी.एम.डब्ल्यू, जॅग्वार जात होत्या. अचानक चालता चालता मला रस्त्यावर एक छोटा साप आडवा पडलेला दिसला. साप नक्की कोणता आहे ते त्या वेळी मला माहीत नसले, तरी त्याच्या जीव वाचवणे आवश्यक होते. पूर्ण खातरी नसल्यामुळे जेमतेम दहा इंचाच्या त्या सापाला मी दोन काटक्यांवर उचलले आणि शेजारी दाट झाडीत नेऊन सोडले. पुढे समजले की तुटकी शेपूट असल्यासारखा दिसणारा हा साप म्हणजे ‘खापरखवल्या’. अत्यंत निरुपद्रवी आणि बिनविषारी. पण पूर्ण खातरी असेपर्यंत प्रत्येक साप विषारी असेल ही शक्यता मनात ठेवून सावधगिरीने वावरणे योग्य.
खेडजवळचे रसाळगड-सुमारगड-महिपतगड हे दुर्गत्रिकूट तसे भटक्यांमध्ये प्रसिद्ध. यातील सुमारगड, महिपतगड आधीच झालेले असल्यामुळे आम्ही तीन मित्रांनी रसाळगडाचा प्लॅन केला. (आता या ट्रेकमध्ये काय काय धमाल झाली ते पुन्हा कधीतरी!) गड उतरून आंबिवलीच्या दिशेने निघालो होतो. मार्चचे दिवस आणि कोकणचे वातावरण, त्यामुळे घामटा निघाला होता. कॅमेरे बॅगेत गेले होते आणि हातात फक्त पाण्याच्या बाटल्या. खाली एक छोट वस्ती लागली. ती ओलांडून पुढे गेलो. अचानक धामणीचे एक जोडपे एकमेकांना वेटोळे घालून उभे असलेले दिसले. एकाच वेळी रोमांचक आणि धामणीच्या लांबीमुळे भयप्रद दृश्य होते. मात्र आमची चाहूल लागताच घाईघाईने वेटोळे सोडवून बाजूच्या बांबूच्या बनात ते धामण युगुल गायब झाले. कदाचित त्यांच्या एकांतात भंग आणल्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला शेवटची बस मिळाली नाही आणि चक्क एका सिंमेटच्या ट्रकमधून खेडपर्यंत यावे लागले.
पाटणजवळच्या मोरगिरीवर ऐन दुपारी चढाई सुरू केली. सकाळी पाटण गावाच्या मागच्या बाजूला असलेला दातेगड उर्फ सुंदरगड पाहून हा मोरगिरीचा बेत आखला. गडाच्या उतारावर एक गुराखी मुलगा भेटला, त्याला वाट विचारली तर तो बरोबर यायला तयार झाला. गड चढता चढता त्याने सांगितले की गडमाथ्याजवळ एक बीळ आहे आणि त्यात अजगर आहे. अजगर बघायला मिळणार याचा आनंद झाला, पण बहुधा भरपेट आहार झाल्यामुळे अजगर महाशयांनी बिळात पडी मारली असावी. मात्र त्याचे बीळ, त्याच्या वावराच्या खुणा पाहायला मिळाल्या.
एकदा चाफळला श्रीरामाचे दर्शन घेऊन तासवडे टोलनाका ओलांडला. टोलनाक्यामुळे चारचाकी वाहने मागेच राहिली. त्यामुळे मोकळा रस्ता मिळाला व बाइकवरून सुसाट निघालो. पण जेमतेम अर्धा कि.मी. गेलो, तोच गाडीच्या हेडलँपच्या प्रकाशात पुढे शंभर-दीडशे फुटांवर एक घोणस रस्ता ओलांडताना दिसला. बाइक वेगात असल्यामुळे थांबवणे शक्य नव्हते. तेव्हा घोणस बाजूला राहील अशा बेताने गाडी वेगात दामटली. ‘नॅरो एस्केप’ म्हणजे काय, ते त्या दिवशी समजले.
पालीजवळचा सुधागड दुर्गभटके आणि पर्यटक यांच्यात चांगलाच प्रसिद्ध आहे. इथे मुक्काम करायचा, तर एकच पर्याय म्हणजे सरकारवाडा. या सरकारवाड्यापासून एक वाट सुधागडाच्या टकमक टोकाकडे जाते. या वाटेवर दाट झाडी आहे. इथे मोठ्या प्रमाणात साप आहेत. पण आम्ही गडावर गेलो असताना या सरकारवाड्याच्या बाहेर चापडा उर्फ बांबू पिट व्हायपर दिसला. खरे तर जहाल विषारी असलेला हा साप चावून मेल्याच्या घटना मात्र आश्चर्यकारकरित्या कमी आहेत. मात्र आत निवांतपणे झोपलेल्या मंडळींना भिंतीपलीकडे मृत्यू वावरतो आहे याची कल्पना नव्हती. त्या वाड्यातील पुजार्याला सांगून चापडा उर्फ हरा नागाला लांब नेऊन सोडून दिले.
सगळ्यात धोकादायक अनुभव आला तो पेठ उर्फ कोथळीगडावर. कर्जतजवळच्या गडावर पावसाळा संपता संपता गेलो होतो. गड उतरून जांबरुखच्या वाटेकडून परत येत होतो. या बाजूने गडाचे अनोखे रूप दिसते. बहुतेक दुर्गभटके आंबिवलीकडून येत असल्याने या बाजूने गडाची मागची बाजू दिसते. इकडून फोटो घेण्यासाठी योग्य कोन शोधत गडाकडे पाहत चालत होतो. अचानक नजर समोर वळली आणि हादरलोच.. जेमतेम पाच-सहा फुटांवरून एक काळाशार नाग वाट ओलांडत होता. अर्थात मला फक्त नागाचा शेवटचा शेपटीकडचा भाग दिसला होता. मनगटापेक्षा जाड, नागमोडी वळण घेत जाणारा तो साक्षात मृत्यू बघून तातडीने पाय थांबले. डोळे खोबणीतून बाहेर येतात की काय, असे वाटले. जेमतेम दोन-तीन सेंकदांत पूर्ण शरीर घामाने थबथबले. कापरे सुटले. विलक्षण भयंकर अनुभव होता तो. अर्थात नागाला माझी चाहूल लागली नाही की तो चाहूल लागली म्हणून घाईघाईने पळत होता ते समजले नाही, पण एक थरारक अनुभव गाठीशी जमा झाला होता.
गंमत म्हणजे हाच पेठचा किल्ला बघून मी जेव्हा तुंगीकडे निघालो, तेव्हा एका मोकळ्या शेतात माझी चाहूल लागल्यामुळे एक धामण बेभान वेगाने आपल्या बिळाकडे पळाली, मात्र हे दृश्य शांतपणे बघितले.
थरारक अशा सर्पकथा ऐकल्यानंतर सर्वात शेवटी बड्या वन्य प्राण्यांचे किस्से सांगतो आणि थांबतो. पहिला किस्सा तोरणा-रायगड ट्रेकला निघालो होतो त्याचा. त्या वेळी वेल्हा-हरपूड हा रस्ता विलक्षण कच्चा होता. कोणत्याही दुर्गम गावात जाणारा असतो त्याप्रमाणे दगडाच्या टेंगळांनी, मातीने भरलेला. बसमध्येही आम्ही मोजके जण होतो. कंडक्टरशी गप्पांचा फड रंगला होता. “बस कोणत्या रस्त्याने जाते आहे ते बघा” असे वाहकाने सांगितल्याने आम्ही रस्त्याकडे बघत होतो, तितक्यात फेंगड्या चालीने वेगाने पळत रस्ता ओलांडताना एक तरस दिसले. आयुष्यातील दुसर्याच ट्रेकमध्ये असा प्राणी बघायला मिळाल्याने भलताच आनंद झाला.
आता आपल्या पूर्वजांचे किस्से – अर्थात मर्कटकथा. वास्तविक मानवी वर्दळीमुळे हमखास खायला मिळण्याची शक्यता असल्यामुळे बहुतेक लोकप्रिय गडांवर माकडे मोठ्या संख्येने असतात. एकंदरीत त्यांचे हावभाव, खाणे मिळवण्यासाठी धडपड आणि हाणामार्या हे सगळे प्रेक्षणीय असते. अगदी फुल्ल मनोरंजन. पण काही वेळा ही माकडे विलक्षण धोकादायक ठरतात.
कल्याणजवळचा मलंगगड ट्रेकर्सपेक्षा त्या दर्ग्याच्या भाविकांच्या जास्त वर्दळीचा आहे. दर्गा माचीवर असला, तरी देवणी सुळका आणि बालेकिल्ला अजूनही पाहण्यासारखे आहेत. पण इथे जाण्यात मुख्य अडचण आहे ती या परिसरात असलेल्या माकडांची. मानवी वावराची सवय असल्यामुळे त्यांना कोणतीच भीती वाटत नाही. मी बालेकिल्ला बघून खाली उतरत होतो. उभ्या कड्यात जेमतेम एक जण जाईल अशी कातळात कोरलेल्या पायर्यांची वाट आहे. खाली उतरत असताना एक माकड समोरून आले. मला वाटले, ते बाजूने जाईल. पण ते चक्क माझ्या समोरच आले आणि आपल्या दोन्ही हातांनी माझी पँट पकडून उभे राहिले. एक क्षणभर मी तर गोंधळून गेलो. उभ्या कड्यात असलेल्या वाटेमुळे पळायलाही जागा नव्हती. बरे, ते माकड काहीतरी खायला मिळेल या आशेवर समोर उभे. त्या परिसरातही मी एकटाच. मात्र काहीही प्रतिकार न करता शांतपणे उभा राहिल्यावर थोड्या वेळाने कंटाळून ते माकड निघून गेले आणि सुटकेचा नि:श्वास टाकून मी खाली उतरलो. गंमत म्हणजे माझ्या मित्राला पुढे याच मलंगगडावर माकडांनी असाच त्रास दिला. एक माकड चक्क त्याच्या सॅकवर उडी मारून त्याची कॅप पकडून बसले. अगदी सिंदबादच्या सफरीत तो म्हातारा त्याच्या पाठीवर ठाण मांडून बसतो, तसे. शेवटी काहीतरी खायला दिल्यावर त्याची सुटका झाली.
अशाच एका पावसाळ्यात आमचा एक ग्रूप तोरणा बघून उतरत होता. पाऊस पडल्यामुळे वाट ही एक मोठी घसरगुंडी झाली होती. त्यात गडावर कचरा नको म्हणून आमच्यातील एकाने खाणे संपलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या एकत्र करून सॅकच्या बाहेर बांधल्या होत्या. गड उतरताना एका ठिकाणी माकडांची टोळी एका झाडावर बसलेली होती. त्यातील एका माकडाला खाण्याचा वास आला आणि ते खाली उतरून सॅकशी झटापट करून ती पिशवी खेचायचा प्रयत्न करू लागले. आधीच निसरडी वाट, एका बाजूला दरी असल्यामुळे धोकादायक झालेली जागा आणि त्या माकडाची त्या पिशव्यांशी चाललेली झोंबाझोंबी.. तो मित्र चांगलाच अडचणीत आला. सुदैवाने ती पिशवी तोडण्यात माकडाला यश आले आणि माझ्या त्या मित्राची सुटका झाली.
अशाच मर्कटलीलांचे आणखी काही किस्से कथन करतो. अशाच एका मोकळ्या दिवशी लोहगडावर चक्कर टाकली. सुट्टीचा दिवस नसल्यामुळे संध्याकाळी गडावर कोणीही नव्हते. विंचूकाटा माची पाहून परत निघालो होतो, तो अचानक एक माकड मागे लागले. पूर्वानुभवामुळे हातात काठी होती, त्यामुळे माकड जवळ येत नव्हते, तरी खायला मिळेल या आशेने त्याने पाठलाग सोडला नाही. मात्र मी काही देत नाही हे पाहिल्यावर गडाच्या महाद्वारातून ते मागे फिरले. इथे माकडांनी विशेष त्रास दिला नसला, तरी हडसरवरचा अनुभव भीतिदायक होता. जुन्नरजवळचा हडसर हा प्राचीन गड आहे. इथे घुमक्कड मोठ्या संख्येने येतात. मात्र गडाच्या महाद्वारातून आत गेले की गडावरचे महादेव मंदिर ते जमिनीच्या खालच्या पातळीवर असलेल्या कोरीव कोठ्यांचा आसपास मोठ्या संख्येने माक्डे आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही आक्रमक आहेत आणि आलेल्या दुर्गभटक्यांना बर्याचदा यांचा उपद्रव होतो. मी नेहमीच्या पायर्याच्या वाटेने हा गड चढून मधल्या बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालून कोरीव कोठ्यांपाशी आलो. इथे माकडांचा एक गट बसला होता. माझी चाहूल लागताच त्यांनी गुरगुरायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही हातांत जाडजूड काठ्या होत्या, हीच काय ती दिलासा देणारी गोष्ट होती. त्यामुळे मनाचा हिय्या करून त्यांच्याकडे न बघता पुढे चालायला सुरुवात केली. मी घाबरत नाही हे लक्षात येताच आणि हातातील काठ्या बघून माकडे धुमचकाट पळाली. पण दुर्गभ्रमंतीत किती सावध असले पाहिजे, याचे हे उदाहरण.
लाल तोंडाची ही बॉनेट माकडे बरी, अशी काळतोंडी लंगूर माकडांची दहशत असते. यांचा अनुभव घेतला तो मराठवाडा-विदर्भ यांच्या सीमेवर असलेल्या माहूरच्या रामगडावर. वास्तविक उदाराम देशमुख आणि रायबाघन, पंडिता सावित्रीबाई देशमुख यांच्या पराक्रमाने ओळखल्या जाणार्या या गडाला सध्या महत्त्व आहे ते देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकेमुळे, तसेच दत्त जन्मस्थानामुळे. क्वचितच कोणी दुर्गभटके रामगडावर जातात. भाविकांच्या गर्दीमुळे आणि सतत प्रसादाच्या नावाखाली खाणे मिळत असल्यामुळे इथे लंगूर मोठ्या प्रमाणात आहेत. भाविक वावरतात त्या मार्गावर ही वानरे दात वाजवत बसलेली असतात. शिवाय त्यांच्यामुळे परिसर घाण होतो, ते वेगळेच. देवीचे दर्शन घेऊन मी गड पाहायला निघालो, तेव्हा त्या भागात वानरांचा मोठा कलकलाट सुरू होता. मी जवळ जाताच त्यांनी दात विचकून मोठ्याने किचकिचाट सुरू केला. अर्थातच त्यांच्या वाटेला जाण्यात अर्थ नव्हता, त्यामुळे त्या वाटेचा नाद सोडून मी दुसर्या वाटेने गडाची उरलेली फेरी पूर्ण केली. विशेष म्हणजे परत आल्यावर याच माहूरच्या गडाच्या घनदाट जंगलात गावकर्यांनी विष घालून तीन बिबटे मारल्याची बातमी वाचली. वास्तविक माकडांच्या वाढत्या उपद्रवावर या बिबट्यांनीच नियंत्रण आणले असते.
धुळ्याजवळचा लळींगचा किल्ला चढत होतो. या गडाच्या खिंडीतून मुंबई-आग्रा महामार्ग जातो. त्या रस्त्यावरची वर्दळ बघताना चढत असल्यामुळे माझी वाट चुकली आणि गडाच्या मागच्या बाजूला पोहोचलो. पण तरीही नेट धरून माथ्याच्या तटबंदीची दिशा धरून चढायला सुरुवात केली. त्याच्या फायदा असा झाला की अचानक झाडीतून दोन भेकरे बाहेर आली. सुरुवातीला त्यांना माझे अस्तित्व जाणवले नाही, पण अचानक एकाची नजर माझ्यावर पडली आणि दोन्ही भेकरे उधळून झाडीत दिसेनाशी झाली.
असाच एक किस्सा घडला वाईजवळ असलेल्या धोम धरणाच्या पाण्यात जहाजासारख्या तरंगणार्या कमळगडाच्या बाबतीत. कमळगडावर चढाईचा मार्ग त्या वेळी एका सांदीतून अडचणीचा होता. आता तिथे शिड्या बसवल्या आहेत. कसेबसे सोपे प्रस्तरारोहण करून वर आलो आणि धोम धरणाच्या पाण्यावरून येणारे थंड वारे खात तटबंदीजवळ उभा होतो. गडाच्या माथ्याखालून उगवलेल्या झाडावर हालचाल झाली. बघतो तर शेकरू ही भली थोरली खार त्या झाडावर उड्या मारत होती. मी अगदी स्थिर उभा असल्याने नकळत माझ्या इतक्या जवळ आली की हाताने मी त्या खारीला आरामात स्पर्श करू शकलो असतो. मात्र माझी काहीतरी हालचाल झाली असावी. त्या शेकराला चाहूल लागली आणि झाडांच्या फांद्यावर उड्या मारत ते दिसेनासे झाले. कोयनेजवळच्या भैरवगडावर गेलो असताना जंगलात असेच शेकरू दिसले. पण ते खूप उंचावरून उड्या मारत नाहीसे झाले.
यापूर्वी तुंगच्या पायथ्याच्या गावातील काजव्यांचा किस्सा लिहिला आहे, त्याच ट्रेकमध्ये तुंग पाहून उतरताना एक प्रसंग घडला. आधी लिहिल्याप्रमाणे तुंगवाडीला जाणार्या एकमेव बसने गेल्यामुळे साधारण सहा-साडेसहा वाजता तुंग चढून सर केला आणि अंधूक उजेडात उतरायला सुरुवात केली. गडाच्या माचीवरून उतरत असताना अचानक गवतातून एक डुक्कर आडवे पळत निघून गेले. गावातील एखादे डुक्कर असेल असे समजून सुरुवातीला विशेष काही वाटले नाही. मात्र अचानक लक्षात आले की गावात डुकरे नव्हती आणि असली तरी गडावर नक्कीच येणार नाहीत.. म्हणजे ते रानडुक्कर होते! मग मात्र चटचट पावले उचलत पायथा गाठला.
साधारण २००५पर्यंत कास पठार प्रसिद्धीच्या फारसे झोतात नव्हते. काही दुर्गभटके आणि वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, हौशी पर्यटक सोडले तर फारसे कोणी इथे जायचे नाही. मात्र सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळाल्यावर आज तिथे काय परिस्थिती आहे, सांगायला नको. याच कास पठारावरून बामणोलीकडे जाताना डाव्या हाताला एक फाटा फुटतो. हा रस्ता जातो भांबवली वजराई धबधब्याकडे. बराच काळ हा धबधबाही वर्दळीपासून दूर होता. मात्र आज तो भारतातील सर्वात उंच धबधबा ठरल्यामुळे इथे गर्दी होऊ लागली आहे. आता तर थेट धबधब्यापर्यंत जायला थेट वाट आणि पर्यटकांसाठी गॅलरी अशा सोयी झाल्या आहेत. तर पाच-सहा वर्षांपूर्वी इथे एका मधल्याच दिवशी सहकुटुंब गेलो होतो. परत येताना आमच्या पुढे असलेली गाडी थांबली आणि ते लोक शेजारच्या गवताळ मैदानात काहीतरी बघत होते.
आम्हीही गाडी थांबवून पाहू लागलो, तर त्या मैदानाच्या टोकाशी दाट झाडी आणि मागे घनदाट झाडीने व्यापलेली टेकडी होती. मैदानात आणि झाडीत गव्यांचा मोठा कळप होता. जाताना आम्हाला तो दिसला होता, पण खूप लांब असल्यामुळे आम्हाला ती स्थानिक लोकांनी चरायला सोडलेली गुरे वाटली. आम्ही काही जण थोडे पुढे चालत जाऊन जवळून गवे पाहू लागलो. मात्र आमची चाहूल लागताच गवे वेगाने दाट झाडीत पळून गेले. आमच्या पुढच्या गाडीतील लोक वारंवार या रस्त्याने जा-ये करत असतात. त्यांनी सांगितले की मागच्या आठवड्यात त्याच परिसरात त्यांना एका बिबट्याने दर्शन दिले होते.
असाच एकदा एन कडाक्याची थंडी सहन करत वर्षाअखेरीच्या प्रसन्न वातावरणात आमचा ग्रूप रात्री आंबेवाडीच्या दिशेने निघाला होता. लक्ष्य होते कळसुबाई रांगेतील मदन आणि कुलंगगड. पुणे-नाशिक रस्ता सोडून जेमतेम भंडारदर्याच्या वाटेला लागतो, तोच गाडीच्या प्रकाशात एक भलामोठा लांडगा आडवा गेला. तातडीने गाडी थांबवून टॉर्च घेऊन आम्ही त्याचा माग काढायचा प्रयत्न केला, पण तो वेगाने झाडीत नाहीसा झाला होता. याच रस्त्यावर रतनगड पाहायला काही वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा एका कोल्ह्याच्या जोडीने दर्शन दिल्याची आठवण झाली.
सगळ्यात शेवटी येऊ या प्राण्यांच्या अन्नसाखळीच्या सर्वोच्च शिखरावर असणार्या मार्जारकुलीन प्राण्यांकडे. यात पट्टेरी वाघ आणि बिबटे येतात. अर्थात महाराष्ट्रापुरते बोलायचे तर पट्टेरी वाघ फक्त विदर्भातच दिसू शकतात. कर्नाटकातील दांडेली अभयारण्याशी आंबोली, दाजीपूर्, कोयना असा जंगलाचा पट्टा जोडला गेल्याने तिकडचे वाघ सह्याद्रीत अधूनमधून येतात, पण इथे कायमचा निवास असल्याची खातरी नाही. त्यामुळे भटकंतीत पट्टेरी वाघाचे दर्शन बहुधा शक्य नाही. मात्र असंख्य अडचणींना तोंड देऊन तगलेला दुसरा मार्जारकुलीन वन्यजीव म्हणजे बिबट्या. याचा मात्र उपद्रव हल्ली सर्वत्र जाणवतो आहे. झाडावर चढण्याची क्षमता, चपळता, लवचीक शरीर आणि धूर्तपणा यामुळे भटकंतीत याच्यापासून सावध राहिलेले चांगले. इतक्या वर्षांच्या भटकंतीत मला या बिबट्याचे अस्तित्वही कधी जाणवले नाही. मात्र ‘ट्रेकक्षितिज’ या डोंबवलीच्या ग्रूपबरोबर बागलाणातील दुंधा, कर्हा, बिष्टा आणि अजमेरा या ट्रेकला गेलो होतो. अतिशय अनवट आणि बहुतेक नियमित ट्रेकर्सनीही न बघितलेले हे गड. सकाळी बिष्टा आणि कर्हा बघून दुंधा गडाच्या पायथ्याशी मुक्काम आणि दुसर्या दिवशी अजमेरा बघून परत, असा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी भल्यापहाटे बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावी पोहोचलो. गावातून एक वाटाड्या घेऊन उजाडायच्या आत गडाकडे निघालो. गडाच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत उजाडले होते. वाटाड्याशी गप्पा मारत मी आणि आमचा ट्रेक लीडर चाललो होतो. अचानक वाटाड्याने आम्हाला थांबायचा इशारा केला. आम्हाला कारण कळेना. त्याने सांगितले की त्याला बिबट्याचे गुरगुरणे ऐकू आले. त्याच्याबरोबर असूनही आम्हाला काहीही ऐकू आले नव्हते. अर्थात गडाच्या दुसर्या बाजूच्या उतारावर मोठ्या संख्येने झुडपे आणि बाभळीची झाडी होती, त्यात तो बिबट्या कोठे गायब झाला, समजले नाही.
हा गड, त्यानंतर कर्हा आणि देवळाणेचे अप्रतिम मंदिर पाहून दुंधा गडाचा पायथा गाठायला संध्याकाळ झाली. अर्थात दुसर्या दिवशीचे वेळापत्रक आणि परतीचा प्रवास लक्षात घेता आम्ही संध्याकाळीच दुंधा पहायचा निश्चय केला. बरोबर दोन स्थानिक वाटाडे घेऊन गडावर निघालो. गडाच्या मध्यभागी असलेले शिवमंदिर आणि पाण्याचे भूमिगत टाके पाहून गडाच्या उत्तरेला असलेले टाके पाहायला निघालो. आमच्या ग्रूपमधील एक जण थोडा पुढे होता. एका वळणावर त्याला एका बिबट्याने दर्शन दिले. माणसाची चाहूल लागताच तो बिबट्या घाईघाईने झाडीत दिसेनासा झाला. एकाच दिवसात बिबट्याचे सह्याद्रीत जाणवलेले हे दुसरे अस्तित्व. मात्र वैयक्तिक मला काही बिबट्या पहायला मिळाला नाही. बघू या जंगलातील हे देखणे जनावर केव्हा दर्शन देते ते.
अनेक वर्षांच्या भटकंतीत वन्यप्राण्यांचे जे काही किस्से अनुभवला आले, ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हे वाचून दुर्गभ्रमंती म्हणजे साप-विंचवांशी गाठ आणि काहीतरी धोकादायक प्रकार असे कोणीही समजू नये. हे वन्यजीवही आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत. आपण त्यांच्या राज्यात जात असतो आणि जोपर्यंत आपण त्यांना काही त्रास देत नाही, तोपर्यंत ते सहसा आपल्या वाटेला जात नाहीत असा बहुतेकांचा अनुभव असतो. तेव्हा आपल्या सृष्टीच्या भाग असलेल्या या जिवांच्या सहजीवनाचा आदर केला, तर भटकंती हा आनंद देऊन जाईल यात शंका नाही.